प्रतिनिधी / रत्नागिरी
रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर चाकरमानी दाखल झाले असून दिवसेंदिवस कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढतच आहे, तरी देखील आपल्याला ही लढाई यशस्वीपणे लढाईची आहे आणि जिंकायचे आहे. यासाठी जिल्ह्यात प्रत्येक गावात कृती दल स्थापन करण्यात आले असून कोरोना संदर्भात उत्तम काम करणाऱ्या या कृती दलांना ‘कोरोना लढा सन्मान’ याद्वारे गौरविण्यात येणार आहे. यासाठी जिल्हास्तरावर 2 लाख पारितोषिक तर तालुका स्तरावर 1 लाख, 50 हजार, 25 हजार आणि मानचिन्ह, प्रमाणपत्र असे पारितोषिक देण्यात येणार आहे. हा उपक्रम रत्नागिरी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी हाती घेतला असून निश्चतच जिल्हा या कोरोनावर मात करेल, असा विश्वास मिश्रा यांनी व्यक्त केला.
या उपक्रमात काम करणाऱ्या कृती दलाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि गावात एका प्रकारे उत्तम काम सुरू राहील, एक सिस्टीम डेव्हलप होईल, लोकांमध्ये कोरोनाबाबत अधिक जनजागृती होईल, या उद्देशाने ‘कोरोना लढा सन्मान’ हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. याची अंमलबजावणी उद्यापासून सुरू होईल. असा उपक्रम राबवणारा रत्नागिरी जिल्हा राज्यातील बहुधा पहिला जिल्हा आहे.