भारत-न्यूझीलंड यांच्यातील जागतिक कसोटी चॅम्पियनशिप फायनल
स्टार खेळाडूंनी लौकिकाला साजेसा खेळ केला तर भारताचे जेतेपद निश्चित
काऊंटडाऊन ः 26
@ विवेक कुलकर्णी / बेळगाव
आगामी जागतिक कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धेतील फायनलच्या पार्श्वभूमीवर, भारत व न्यूझीलंड या संघातील संभाव्य संघावर नजर टाकता, भारतीय संघात एकापेक्षा एक स्टार खेळाडू असल्याचे जाणवते. मात्र, या स्टार खेळाडूंनी आपल्या लौकिकाला खेळ साकारणे सर्वाधिक महत्त्वाचे असेल. कारण, तसे झाले तरच भारताला न्यूझीलंडसारख्या तगडय़ा प्रतिस्पर्ध्याला नमवणे शक्य होईल. भारतीय स्टार खेळाडू आपले स्टारडम बाजूला ठेवून लौकिकाला साजेसे खेळू शकले नाहीत तर मात्र न्यूझीलंडचा संघ जेतेपद काबीज करण्यात अजिबात कसर सोडणार नाही.
या स्पर्धेत गुणतालिकेतील पहिले दोन संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरतात. त्यानुसार, भारत व न्यूझीलंड कसोटी चॅम्पियनशिपसाठी आमनेसामने भिडणार आहेत. उभय संघातील ही लढत पुढील महिन्यात रंगणार आहे.
रोहितमुळे भारत मजबूत
सलामीच्या आघाडीवर रोहित शर्मासारखा (38 कसोटीत 2615) दिग्गज फलंदाज असल्याने भारतीय संघ मजबूत आहे. मात्र, रोहितचा सलामीवीर मयांक अगरवाल असेल की शुभमन गिल, हे अद्याप निश्चित झालेले नाही. केएल राहुल दुखापतीतून सावरत असल्याने त्याचे यातून सावरणे महत्त्वाचे असेल. शुभमनची विस्फोटक फलंदाजीची क्षमता निर्विवाद असली तरी सध्या तो खराब फॉर्ममध्ये आहे, यामुळे सलामी जोडीत बदल केला गेला तर त्यात आश्चर्याचे कारण असणार नाही.
दुसरीकडे, न्यूझीलंडचे टॉम लॅथम (3929 धावा) व टॉम ब्लंडेल (538 धावा) सलामीवीर फ्लाईंग स्टार्ट मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असू शकतात. मधल्या फळीत केन विल्यम्सन (83 सामन्यात 7115 धावा), रॉस टेलर (105 सामन्यात 7379 धावा), हेन्री निकोल्स (37 सामन्यात 2152 धावा) हे समयोचित योगदान देऊ शकतात. भारतीय मध्यफळीची धुरा अजिंक्य रहाणे (73 सामन्यात 4583 धावा), चेतेश्वर पुजारा (85 सामन्यात 6244 धावा), विराट कोहली (91 सामन्यात 7490 धावा) यांच्यामुळे मजबूत आहे.
न्यूझीलंडच्या यष्टीरक्षणाची धुरा बीजे वॅटलिंगकडे असणार आहे. वॅटलिंगने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपची फायनल झाल्यानंतर आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याची घोषणा यापूर्वीच केली असून येथे विजयी सांगता करण्याचा त्याचा अर्थातच प्रयत्न असणार आहे. वॅटलिंगने 73 सामन्यात 3773 धावांचे योगदान आजवर दिले आहे. शिवाय, यष्टीमागे 259 झेल व 8 यष्टीचीत बळी टिपले आहेत. भारतासाठी रिषभ पंत हा आता पहिल्या पसंतीचा यष्टीरक्षक झाला आहे. त्याने आजवर खेळलेल्या 20 कसोटी सामन्यात 1358 धावा फटकावल्या आहेत तर यष्टीमागे 75 झेल व 7 यष्टीचीत बळी मिळवले आहेत. वृद्धिमान साहा व केएल राहुल आवश्यकतेनुरुप यष्टीरक्षण करु शकतात.
जडेजा-अश्विन आघाडीचे अष्टपैलू
अष्टपैलू खेळाडूंच्या निकषावर रविंद्र जडेजा व रविचंद्रन अश्विन यांच्यामुळे भारतीय संघ सरस भासतो. जडेजा व अश्विन हे दोघेही फिरकी अष्टपैलू असून त्यांच्यामुळे संघाची फलंदाजी आणखी सखोल ठरत आली आहे. अक्षर पटेल व वॉशिंग्टन सुंदर असे आणखी दोन अष्टपैलू भारतीय संघात समाविष्ट आहेत. कॉलिन डे ग्रँडहोम या आघाडीवर न्यूझीलंडसाठी उत्तम योगदान देऊ शकतो.
जलद गोलंदाजीच्या आघाडीवर इशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रित बुमराह हे तिघे दिग्गज भेदक मारा साकारु शकतात. शिवाय, शार्दुल ठाकुर, उमेश यादव, मोहम्मद सिराज यांचे पर्यायही संघाकडे असणार आहेत. दुसरीकडे, न्यूझीलंड संघातही ट्रेंट बोल्ट, टीम साऊदी, मॅट हेन्री, नील वॅग्नर, काईल जेमिसन यांच्यासारख्या एकापेक्षा एक अव्वल गोलंदाजांमुळे न्यूझीलंडची लाईनअप देखील तितकीच मजबूत आहे. खेळपट्टी मंद गोलंदाजीला अनुकूल असेल तर मिशेल सॅन्टनरचा (23 सामन्यात 41 बळी) पर्याय देखील किवीज संघाकडे असणार आहे.
भारत-न्यूझीलंड शेवटच्या 10 कसोटी सामन्याचे निकाल
तारीख / निकाल / ठिकाण
29 फेब्रु. ते 2 मार्च 2020 / न्यूझीलंड 7 गडी राखून विजयी / ख्राईस्टचर्च
21 ते 24 फेब्रुवारी 2020 / न्यूझीलंड 10 गडी राखून विजयी / वेलिंग्टन
8 ते 11 ऑक्टोबर 2016 / भारत 321 धावांनी विजयी / इंदोर
30 सप्टें. ते 3 ऑक्टोबर 2016 / भारत 178 धावांनी विजयी / कोलकाता
22 ते 26 सप्टेंबर 2016 / भारत 197 धावांनी विजयी / कानपूर
14 ते 18 फेब्रुवारी 2014 / सामना अनिर्णीत / वेलिंग्टन
6 ते 9 फेब्रुवारी 2014 / न्यूझीलंड 40 धावांनी विजयी / ऑकलंड
31 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर 2012 / भारत 5 गडी राखून विजयी / बेंगळूर
23 ते 26 ऑगस्ट 2012 / भारत 1 डाव, 115 धावांनी विजयी / हैदराबाद
20 ते 23 नोव्हेंबर 2010 / भारत 1 डाव, 198 धावांनी विजयी / नागपूर