ऑनलाइन टीम / पुणे :
आपल्या पाल्याने डॉक्टर, इंजिनिअर किंवा मोठा उद्योगपती व्हावे असे सर्वच पालकांना वाटते. त्यानुसार त्याला तसे शिक्षण पालक देण्याचा प्रयत्न करतात. परंतु आपल्या मुलाने देशाचा एक चांगला नागरिक बनावे यासाठी आधी प्रयत्न केले पाहिजे व तसे संस्कार मुलांवर केले पाहिजे. मुलांना लहान वयातच भगवद्गीतेचे आणि शूरवीरांच्या आदर्शाचे संस्कार दिले तर ते देशाचे उत्तम नागरिक घडतील, असे मत युवा व्याख्याते प्रथमेश रत्नपारखी यांनी व्यक्त केले.
शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी, जिजामाता स्मारक समिती आणि स्वरुपवर्धिनी यांच्यावतीने राजमाता जिजाऊ जयंती सोहळ्याचे आयोजन सदाशिव पेठेतील गीता धर्म मंडळ येथे करण्यात आले होते. कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करताना रत्नपारखी बोलत होते. शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीच्या सेवाव्रतींनी लोकमान्य लोकशाहीरा घ्या मानाचा मुजरा… या पोवाड्याचे तर जिजामाता स्मारक समितीच्या सेविकांनी जिजाऊ यांच्या जीवनावरील नाट्यप्रवेश, स्वरुपवर्धिनीच्या सेविकांनी राजमातांच्या पोवाड्याचे सादरीकरण केले.
प्रथमेश रत्नपारखी म्हणाले, जिजाऊंनी स्वराज्यातून भ्रष्टाचार नाहिसा केल्यास स्वराज्यात पोकळी निर्माण होणार नाही. प्रत्येक स्त्रीचा आदर,सन्मान करायचा. रयत मोठी करायची असेल तर स्वत: आधी चांगले नागरिक बनले पाहिजे. मिळालेल्या विजयाचा कधी उन्माद करू नये, अशी शिकवण शिवाजी महाराजांना दिली. आपली संस्कृती, परंपरा आपण मानल्या पाहिजेत, परंतु ज्या अनीष्ट परंपरा आहेत त्यांना तिलांजली दिली पाहिजे. जिजाऊंनी बंधनातून बाहेर जाऊन हिंदवी स्वराज्याचे स्वप्न बघितले. आजच्या महिला तर मुक्त आहेत, त्यांनी देखील अशी स्वप्ने बघीतली पाहिजेत, असे ही त्यांनी सांगितले.