जगातील 15 प्रमुख भांडवलबाजारांमध्ये मोठी झेप ः बाजार भांडवलप्रकरणी कॅनडा, सौदी अरेबियाला मागे टाकले
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
देशांतर्गत भांडवली बाजाराने यंदा 1 जानेवारी ते 5 फेब्रुवारीपर्यंत गुंतवणुकदारांना सुमारे 6.94 टक्क्यांचा परतावा दिला आहे. या दृष्टीकोनातून भारतीय भांडवली बाजार जगात दुसऱया स्थानावर पोहोचला आहे. जगातील प्रमुख 15 भांडवली बाजारांच्या यादीत हाँगकाँग पहिल्या स्थानावर असून त्याने आतापर्यंत 8 टक्क्यांचा परतावा दिला आहे. तर बाजार भांडवलाप्रकरणी भारताने कॅनडाला मागे टाकून सातव्या स्थानावर झेप घेतली आहे.
शुक्रवारच्या दिवशी भारताचे बाजार भांडवल 2.7 लाख कोटी डॉलर्स राहिले. हा आकडा जर्मनी आणि सौदी अरेबियापेक्षाही अधिक मोठा झाला आहे. भारत लवकरच सहाव्या क्रमांकावर असलेल्या फ्रान्सलाही मागे टाकणार असल्याची अपेक्षा आहे. फ्रान्सचे बाजार भांडवल 2.86 लाख कोटी डॉलर्सचे आहे.
भारतीय बाजारात विक्रमी वधार
8 फेब्रुवारी रोजी समभागबाजार सलग 6 व्या दिवशी तेजीसह बंद झाला आहे. 1 फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर केल्यापासून हा वधार सुरू आहे. या कालावधीत मुंबई शेअरबाजार निर्देशांक 51 हजार तर राष्ट्रीय शेअरबाजार निर्देशांकाने 15 हजाराचा विक्रमी टप्पा ओलांडला आहे. एक्सचेंजवर नोंदणीकृत कंपन्यांचे एकूण बाजार भांडवलही वाढून 203 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक झाले आहे.
आगामी काळातही तेजीची अपेक्षा
बाजार विश्लेषकांनुसार आगामी तिमाहींमध्ये भारताची अर्थव्यवस्था सुधारणार आहे. याचमुळे समभागबाजारात सकारात्मक वृद्धी दिसून येऊ शकते. यातून भांडवली बाजाराचा आकारही वाढणार आहे, तर युरोपमध्ये अद्याप कोरोनाचा प्रभाव कमी झालेला नाही. बाजार भांडवलाप्रकरणी पहिल्या 7 देशांमध्ये युरोपचे केवळ बाजार फ्रान्स आणि ब्रिटन सामील आहेत.
विदेशी गुंतवणुकीमुळे आकार वाढतोय
प्रचंड विदेशी गुंतवणुकीमुळे भारतीय समभागबाजाराचा आकार वाढत आहे. एनएसडीएलच्या विदानुसार 2021 मध्ये आतापर्यंत 29.54 हजार कोटी रुपयांचे फॉरेन पोर्टफोलियो इन्व्हेस्टमेंट (एफपीआय) झाली आहे. उदयोन्मुख बाजारात गुंतवणुकीच्या दृष्टीकोनातून भारत दुसऱया स्थानावर आहे. ब्राझीलच्या समभागबाजारात सर्वाधिक 32.83 हजार कोटी रुपयांची एफपीआय आली आहे.
आगामी तिमाहींमध्ये विकासाचा अनुमान
भारतासारख्या उदयोन्मुख्य बाजारांना अमेरिकेच्या डॉलरमधील कमजोरीचा लाभ मिळाला आहे. तज्ञांनुसार भारताची अर्थव्यवस्था वेगाने पूर्वपदावर येत आहे. तसेच सरकारही विकासावर लक्ष केंद्रीत करत असल्याने कोविड-19 ने खालावलेल्या अर्थव्यवस्थेत सुधारणा होत आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनुसार 2021-22 या आर्थिक वर्षात भारताचा विकासदर 11.5 टक्के तर 2022-23 मध्ये 6.8 टक्के राहणार आहे.