आपल्या सृष्टीमध्ये प्रत्येक जीवमात्राला भावना असतात. कुठलाही जीव भावनाविरहित नाही. मुक्मया-प्राण्यांना, जनावरांना पण काही सांगायचे असते. त्यांना कदाचित एकमेकांची अबोल भाषा कळतही असेल. पण मनुष्याला मात्र ती भाषा समजेलच असे नाही. त्याकरिता मनुष्य या पातळीवरून वर उठून स्वतःची आध्यात्मिक प्रगती साधल्याशिवाय आपण इतर जीवमात्रांच्या भावभावना समजू शकत नाही. त्यांचे भावविश्व जाणू शकत नाही. त्यांच्या सुखदु:खात एकरूप होऊ शकत नाही. संपूर्ण सृष्टीचे संचलन कसे चालते? ते कसे घडते? त्यात कसा बदल होतो? हे जाणून घेणारा हा जाणकार मनुष्य म्हणजेच संत-सत्पुरुष होय! श्रीसमर्थ रामदास स्वामी असेच श्रे÷ जाणकार संत-सत्पुरुष होते. ते द्रष्टे पुरुष होते. त्यामुळेच श्रीमत् दासबोध ह्या ग्रंथराजाची ते निर्मिती करू शकले.
दासबोधातील दुसऱया दशकातील दुसऱया समासात मूर्खलक्षणे सांगताना समर्थ म्हणतात की, मुकी वस्तू निघते मारी! म्हणजे मुक्मया प्राण्यांना जो शस्त्राने मारतो त्याला मूर्ख समजावे. दशक पहिल्यातील दहाव्या समासात नरदेह स्तवन निरुणात समर्थ म्हणतात की ‘घोडा, गाय, बैल, म्हैस ही जनावरे आणि इतर पशु दयाळूपणे मोकळे सोडले तर त्यांना कोणीही धरून नेईल.’ यावरून समर्थांनी मुक्मया प्राण्यांच्या मानसिकतेचा केलेला सूक्ष्म अभ्यास आपल्याला जाणवून येईल.
व्यवस्थापनशास्त्रात कामगार, कर्मचारी आणि मालक यांचे एकमेकांशी असलेले संबंध जो योग्य पद्धतीने जाणून घेतो तोच योग्य किंवा उत्तम व्यवस्थापक असतो. कर्मचारी किंवा कामगार काही वेळेस असमाधानी असतात. हेच असमाधान
तक्रारींचे कारण बनते. अनेकवेळा संस्थेच्या, संघटनेच्या गरजेप्रमाणे असमाधानी कर्मचारी, कामगार काम पूर्ण करत नाहीत. हे असमाधान ओळखणे आणि त्यावर नीट उपाययोजना करणे म्हणजेच व्यवस्थापन शास्त्रातील भाव विश्व जाणून घेणे होय! ज्यांना प्रसंगाचे गांभीर्य समजते, जे समस्येच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करतात आणि कमी कालावधीत अचूक निर्णय घेतात तेच उत्तम व्यवस्थापक असतात. सुदैवाने आपल्याला मनुष्यजन्म प्राप्त झाला आहे त्यामुळे आपण मानवी स्वभावाचे आकलन करणे गरजेचे आहे.
अनेक व्यवस्थापन तज्ञांनी असे सांगितले आहे की व्यवस्थापनाच्या लक्षात आणून दिलेल्या कार्याशी संबंधित असमाधान किंवा अन्यायाची भावना म्हणजेच तक्रार होय! तसेच जे असमाधान हे कर्मचाऱयांना किंवा कामगारांना अयोग्य वाटते, अन्यायपूर्ण वाटते, असे असमाधान व्यक्त केलेले असो किंवा नसो, कायदेशीर असो अथवा नसो याला तक्रार असे म्हणतात. कधी कधी हे असमाधान कर्मचाऱयांच्या कौटुंबिक किंवा वैयक्तिक समस्येतून उद्भवलेले असते तर रोजगारासंबंधित असते. व्यक्त तक्रारींचे स्वरूप हे टीका करणे, आर्जव करणे, अफवा पसरवणे अशा प्रकारचे असमाधान असू शकते, तर अव्यक्त स्वरूपाचे असमाधान हे कार्यक्षमतेवरील विपरीत परिणाम, गैरहजेरी, तत्परतेचा अभाव असे असते. संस्थेतील असमाधान हे अनेकवेळा सयुक्तिक किंवा योग्य अयोग्य आणि असयुक्तिक अथवा हास्यास्पद पण असते. परंतु, जी तक्रार योग्यवेळा सोडवली जात नाही त्यातून कर्मचाऱयांचे मनोधैर्य आणि उत्पादकतेवरसुद्धा परिणाम होतो. औद्योगिक संस्थेत मालक आणि कामगारकर्मचारी यांच्यातील संबंधांवरून जे तंटे उद्भवतात त्यामुळे अतिशय अशांत वातावरण संस्थेत निर्माण होते. काही वेळेस रोजगाराच्या ठिकाणी परिस्थिती किंवा एखादी घटना कामगारांच्या व्यक्तिगत आणि सामूहिक समाधानात जात नसेल तर त्यातून तक्रार निर्माण होऊ शकेल. यातूनच पुढे वेतन आणि इतर अनुषंगिक लाभ, कामाचे तास, पदोन्नती, पदावनती आणि इतरही प्रश्न उत्पन्न होतात. व्यवस्थापन शास्त्रात परिस्थिती सगळीकडे सारखीच असते. परंतु, ज्यांना उत्तम व्यवस्थापक व्हायचे असेल त्यांनी स्वतःची मनःस्थिती सकारात्मक पद्धतीने बदलणे गरजेचे आहे. म्हणूनच समर्थ म्हणतात की,
सकळांसी नम्र बोले ! मर्यादा धरून चाले !
सर्व जन्म तोषविले ! तो सत्त्वगुण !!
सकळ जनासी आर्जव ! नाहीं विरोधासी ठाव !
परोपकारी वेची जीव ! तो सत्त्वगुण !! 02/07/63-64
म्हणजे, नम्रपणे बोलणे, नीतीमर्यादांचे पालन करणे, सर्व लोकांना संतोष देणे म्हणजे सत्त्वगुण होय. तर जो सर्वांशी अत्यंत नम्रपणे आणि सरळपणाने वागतो, कुठे कोणाला विरोध उत्पन्न व्हावयास वाव देत नाही, परोपकार करण्यास जो आयुष्य खर्ची घालतो तो सत्त्वगुण होय.जो उत्कृष्ट व्यवस्थापक असतो त्याने संस्थेतील कामगारांपासून ते मालकापर्यंत सर्वांशी नम्रपणे बोलावे, संस्थेतील व कार्यक्षेत्रातील सर्व नियमांचे, कायद्यांचे पालन करावे, संस्थेतील प्रत्येकाला समाधान वाटेल असे वर्तन करावे. त्यामुळे संस्थेतील वातावरण विरोध, असंतोष आणि असमाधान निर्माण होत नाही.
व्यवस्थापनशास्त्रात केवळ तक्रारी ऐकणे हे महत्वाचे नसून, त्या तक्रारी नीट समजावून घेणे अत्यंत गरजेचे असते. त्या तक्रारींचे स्वरूप, त्यातील तथ्य, त्या तक्रारींची सत्यता पडताळणी करणे आणि मग अचूक निर्णय घेणे म्हणजेच व्यापक स्तरावर कार्य करणे होय! याकरिताच प्रत्येक व्यक्तीचे भावविश्व समजून घ्यावे. मानवाने इतर मानवाचे अंतरंग जाणून घेणे अत्यावश्यक असते. जे व्यवस्थापन शास्त्रात कार्यरत आहेत त्यांनी मानवी भाव भावना, समज-गैरसमज, मानसिकता, मनोविकृती आणि मनोविकार यांची उत्तम माहिती करून घेणे गरजेचे आहे.
व्यवस्थापन शास्त्रात प्रश्न हे सतत निर्माण होत राहणार आहेत. समस्या क्षणाक्षणाला भेडसावत राहणार. संस्थेतील प्रत्येकाचे गुण-दोष हे कायम असणार आहेत. परंतु, यातून जर योग्य मार्ग शोधायचा असेल तर श्रीसमर्थांच्या दासबोधाशिवाय अन्य पर्याय नाही. ज्यांना स्वतःचे उद्योगसमूह, संस्था, संघटना आणि राष्ट्र प्रगतीपथावर न्यायचे आहे त्यांच्याविषयी समर्थ म्हणतात की,
आपकार्याहून जीवी ! परकार्यसिद्धी करावी !
मरोन कीर्ती उरवावी ! तो सत्त्वगुण !!पराव्याचे दोष-गुण ! दृष्टीस देखे आपण !समुद्रा ऐसी साठवण ! तो सत्त्वगुण !! 02/07/65-66
म्हणजे, स्वतःचे काम करण्यापेक्षा दुसऱयाचे काम करण्याची ओढ ज्यांना असते. मरून कीर्ती उरवावी तो सत्त्वगुण होय. दुसऱयाचे गुण दोष ज्याच्या नजरेस पडतात पण समुद्राप्रमाणे जो ते आपल्या अंतःकरणात साठवतो, ते जगात प्रगत करत नाही तो सत्त्वगुण होय! उत्तम व्यवस्थापकास तक्रार निवारण करत असताना स्वतःपेक्षा इतरांना महत्त्व देणे गरजेचे असते, त्यांची तक्रार सोडवणे गरजेचे असते. संस्थेतील इतर कोणाचेही गुण दोष नजरेस दिसू लागताच ते प्रगट न करता जो त्यात बदल घडवून आणतो त्यास उत्तम व्यवस्थापक असे म्हणावे.
माधव किल्लेदार