चिपळूण येथे वाळू उत्खननाच्या कामासाठी आले होते कामगार
प्रतिनिधी/ खेड
परराज्यातून आलेल्या कामगारांना लॉकडाऊनमुळे हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. उपासमारीमुळे कामगार पायी प्रवास करत गावी जाण्याचा निर्णय घेत आहेत. मध्यप्रदेशला चालत निघालेल्या 15 कामगारांना ताब्यात घेण्यात आल्याची घटना ताजी असतानाच चिपळूण येथून रेल्वे ट्रकने पायी प्रवास करत उत्तरप्रदेशला निघालेल्या 16 मजुरांनाही गुरूवारी रात्री येथील रेल्वे स्थानकाजवळ रोखण्यात आले. या सर्वांची प्राथमिक तपासणी करून क्वारंटाईन करण्याच्या हालचाली सुरू होत्या.
चिपळूण येथे वाळू उत्खननाच्या कामासाठी हे कामगार उत्तरप्रदेशमधून येथे आले होते. लॉकडाऊनमुळे सर्वच ठप्प असल्याने जेवणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. कामधंदाच नसल्याने पोटाची खळगी भरायची कशी, या चिंतेत असलेले परराज्यातील कामगारही रेल्वे ट्रकने पायी प्रवास करत गाव गाठण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र जागरूक नागरिकांसह प्रशासकीय यंत्रणांच्या सतर्कतेमुळे हे कामगार तावडीत सापडत आहेत. दोनच दिवसांपूर्वी महामार्ग चौपदरीकरणासाठी आलेले 15 कामगार मध्यप्रदेशला रेल्वे ट्रकने पायी प्रवास करत निघालेले असताना त्यांना ताब्यात घेऊन पुन्हा कंपनीच्या ठेकेदाराकडे स्वाधीन करण्यात आले.
चिपळूण येथे वाळू उत्खननाच्या कामासाठी हे कामगार आले हेते. छुप्या पद्धतीने वाळू उत्खनन करण्यास या कामगारांनी नकार देताच संबंधित वाळू व्यावसायिकाने कामगारांना गावी जाण्यास सांगितले. पोटा-पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने हे कामगारही चिपळूण येथून उत्तरप्रदेशला जाण्यासाठी पायी प्रवासाला निघाले. येथील रेल्वेस्थानकानजीक आले असता सर्वांना अडवण्यात आले. या बाबत प्रशासनास कळवल्यानंतर तातडीने त्यांना ताब्यात घेण्यात आले.