बेंगळूर / वृत्तसंस्था
यष्टीरक्षक-फलंदाज हार्दिक तमोरेने 115 धावांची खेळी साकारल्यानंतर मुंबईने उत्तरप्रदेशविरुद्ध रणजी चषक स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात पहिल्या डावात सर्वबाद 393 धावांपर्यंत मजल मारली. प्रत्युत्तरात उत्तरप्रदेशची दुसऱया दिवसअखेर 2 बाद 25 अशी दैना उडाली. समर्थ सिंग (0) व प्रियम गर्ग (5) हे दोन्ही सलामीवीर स्वस्तात बाद झाले.
या उपांत्य सामन्याचा पहिला दिवस मुंबईचा युवा सलामीवीर यशस्वी जैस्वालने गाजवला तर दुसऱया दिवशी हार्दिकने शानदार शतक साजरे केले. हार्दिकला आदित्य तरेला दुखापत झाल्याने संघात स्थान लाभले. या स्पर्धेतील दुसऱया उपांत्य लढतीत मध्यप्रदेशच्या 341 धावांना प्रत्युत्तर देताना बंगालची 5 बाद 197 अशी स्थिती झाली.