संतकबीरनगरमध्ये अमित शाह यांचे विधान
केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शाह यांनी सोमवारी संतकबीरनगर येथील मेंहदावल मतदारसंघात जाहीर सभेला संबोधित केले आहे. उत्तरप्रदेशात सुमारे 2 हजार कोटींची जमीन माफियांनी बळकावली होती. योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने 2 हजार कोटींची ही जमीन माफियांपासून मुक्त करवून घेत गरीबांसाठी घरे उभारली असल्याचा दावा शाह यांनी केला आहे.
उत्तरप्रदेश आता दूध उत्पादनात, आवळा उत्पादनात, ऊस उत्पादनात, साखर उत्पादनात, बटाटे उत्पादनात पहिल्या क्रमांकावर आहे. 5 वर्षांपूर्वी कुठल्याही गोष्टीत उत्तरप्रदेश अग्रस्थानी नव्हता. 5 वर्षांपूर्वी पर्यंत दरोडेखोरीत, महिलांवरील अत्याचारात, अपहरण-खंडणीवसुलीत, हत्याप्रकरणी उत्तरप्रदेश पहिल्या स्थानावर होता. योगी सरकारच काळात उत्तरप्रदेशातील दरोडय़ांच्या घटनांमध्ये 70 टक्क्यांची घट झाली आहे. तर लुटीच्या घटना 69 टक्के, हत्येच्या 29 टक्के आणि बलात्काराच्या घटनांमध्ये 52 टक्क्यांची घट झाल्याचे शाह म्हणाले.
उत्तरप्रदेशात एकेकाळी केवळ रमजानमध्ये 24 तास वीज पुरविली जात होती. परंतु जन्माष्टमी, दिवाळी, होळीत 24 तास वीज पुरविली जात नव्हती. समाजवादी पक्षाने विजेचाही धर्म ठरविला होता. भाजप सरकारने सर्व सणांमध्ये 24 तास वीज देण्याचे काम केल्याचे म्हणत शाह यांनी समाजवादी पक्षाला लक्ष्य केले आहे.