10 दिवसांत शेतकऱयांचे कर्ज माफ करणार : सर्वांचे वीज बिल निम्मे करणार
उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या मतदानापूर्वी काँग्रेसने स्वतःचे तिसरे घोषणापत्र ‘उन्नति विधान’ जारी केले. काँग्रेस सरचिटणीस प्रियंका वड्रा यांनी राज्याला उत्तम स्थितीत नेण्याचा प्रयत्न करणार असल्याचे म्हटले आहे. जनघोषणापत्र जनतेत जाऊन तयार करण्यात आले आहे. सर्वसामान्यांशी चर्चा करूनच या योजना घोषणापत्रात सामील केल्याचे त्या म्हणाल्या.
काँग्रेस सरकार सत्तेवर आल्यास 10 दिवसांच्या आत शेतकऱयांचे पूर्ण कर्ज माफ केले जाईल. एक क्विंटल गव्हासाठी 2500 रुपयांचा दर दिला जाणार आहे. 20 लाख शासकीय नोकऱया प्रदान केल्या जातील. 12 लाख रिक्त पदे त्वरित भरण्यात येतील. याचबरोबर 8 लाख रोजगार निर्माण करू. 40 टक्के रोजगार महिलांना देण्यात येईल. गोधन न्याय योजनेच्या अंतर्गत शेण खरेदी केले जाणार असून यामुळे भटक्या गुरांमुळे होणारा त्रास दूर करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे प्रियंका यांनी म्हटले आहे.
घोषणापत्रातील ठळक आश्वासने..
-10 दिवसांमध्ये शेतकऱयांचे कर्ज माफ करणार
-गव्हाला प्रति क्विंटल 2500 रुपये तर ऊसाला 400 रुपयांचा दर
-वीज बिल निम्मे करणार, कोरोनाकाळातील थकबाफी माफ करणार
-20 लाख शासकीय रोजगार मिळवून देण्यात येणार
-कोरोना पीडितांना 25 हजार रुपये देण्यात येणार
-कुठल्याही आजारावर सरकारकडून 10 लाखांपर्यंतचा मोफत उपचार
-भटक्या प्राण्यांमुळे नुकसान झाल्यास 3000 रुपयांची भरपाई
-गोधन न्याय योजना सुरू करणार, 2 रुपये दराने शेण खरेदी करणार
-आउटसोर्सिंग बंद करणार, कंत्राटी कर्मचाऱयांना नियमित करणार
-आचाऱयाचे वेतन 5000 रुपयांपर्यंत वाढविण्यात येणार
-झोपडपट्टीवासीयांच्या नावावर जमीन करणार
-सुरक्षारक्षकांचे वेतन 5 हजार रुपये प्रतिमहिना केले जाणार
-शाळांमधील अवाजवी शुल्कवाढ रोखण्यात येणार
-शिक्षामित्रांना अनुभवाच्या आधारावर नियमित करणार
सर्व घटकांचा घोषणापत्रात विचार ः खुर्शीद काँग्रेसच्या घोषणापत्राचे दोन भाग यापूर्वीच जारी करण्यात आले होते. पहिले घोषणापत्र महिलांना समर्पित होते. दुसऱया घोषणापत्रात तरुणाईकरता आश्वासने मांडण्यात आली होती. यावेळी उत्तरप्रदेशची स्थिती विचारात घेत आम्ही घोषणापत्र तयार केले आहे. कोरोना काळातही लोकांमध्ये जात आणि त्यांच्या सुचनांच्या आधारावर ते तयार करण्यात आले. प्रियंका वड्रा यांच्या निर्देशावर आम्ही जनतेशी संवाद साधला. सर्व जिल्हय़ांमध्ये पोहोचलो, अनेक लोकांसोबत चर्चा केली, तज्ञांचे मत जाणून घेतले. त्यानंतर उन्नति विधान तयार झाल्याचा दावा काँग्रेसचे वरिष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनी केला आहे.