नितीश अन् योगी परस्परांना देणार प्रत्येकी 7 गावांचे ‘गिफ्ट’
वृत्तसंस्था/ पाटणा
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ लवकरच परस्परांना प्रत्येकी 7 गावांचे ‘गिफ्ट’ देणार आहेत. हा निर्णय या गावांमधील लोकांच्या अडचणी दूर करण्यासाठी घेतला जात आहे. उत्तरप्रदेश आणि बिहारमधील सुमारे 14 गावे परस्परांच्या सीमेला अत्यंत लागून आहेत. अशा स्थितीत आता बिहार आणि उत्तरप्रदेशचे सरकार प्रत्येकी 7 गावांची परस्परांमध्ये अदलाबदल करणार असल्याने दोन्ही राज्यांचा नकाशा बदलणार आहे.
उत्तरप्रदेशच्या कुशीनगर जिल्हय़ातील बिहार सीमेवरील 7 गावे पश्चिम चंपारण्य जिल्ह्य़ात समाविष्ट होतील. अशाचप्रकारे पश्चिम चंपारण्यमधील 7 गावे उत्तरप्रदेशला मिळणार आहेत. याप्रकरणी सहमती झाल्यावर दोन्ही राज्यांकडून केंद्र सरकारला प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे.
केंद्राची मंजुरी मिळताच..
केंद्र सरकारकडून या प्रस्तावाला मंजुरी मिळताच दोन्ही राज्यांचा नकाशा बदलणार आहे. तिरहुतच्या विभागीय आयुक्तानी यासंबंधी जिल्हाधिकारी कुंदन कुमार यांना पत्र पाठविले आणि उत्तरप्रदेशच्या सीमेला लागून असलेल्या बिहारच्या 7 गावांचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश दिले आहेत.
गावांची देवाणघेवाण
आयुक्तांच्या पत्रानुसार गंडक नदीपलिकडील पिपरासी भागातील बैरी स्थान, मंझरिया, मझरिया खास, श्रीपतनगर, नैनहा, भैसही आणि कतकी गावांमध्ये प्रशासनासह ग्रामस्थांनाही उत्तरप्रदेशातून ये-जा करावी लागते. यामुळे अनेक प्रकारच्या प्रशासकीय आणि मानवी समस्या निर्माण होतात. अशाचप्रकारे उत्तरप्रदेशच्या कुशीनगर जिल्हय़ातील मरछहवा, नरसिंहपूर, शिवपूर, बालगोविंद, वसंतपूर, हरिहरपूर आणि नरैनापूर गावांची स्थिती आहे. ही गावे बिहार सीमेवरील बगहा जिल्हय़ाला लागून आहेत.
निवृत्त शिक्षकाचे आवाहन
एका निवृत्त शिक्षकाने सप्टेंबर महिन्यात मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्याकडे याप्रकरणी त्यांच्या जनता दरबारात विनंती केली होती. आमचे गाव उत्तरप्रदेशच्या सीमेला लागून आहे. उत्तरप्रदेशचा कुशीनगर जिल्हा गावापासून केवळ एक किलोमीटर अंतरावर आहे. अशा स्थितीत हे गाव उत्तरप्रदेशात सामील करणे चांगले ठरणार असल्याचे निवृत्त शिक्षकांनी म्हटले होते.