नवी दिल्ली /प्रतिनिधी
चार महिन्यापूर्वीच मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेले उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथसिंह रावत यांनी शुक्रवारी रात्री राज्यपाल बेबी रानी मोर्या यांच्याकडे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. शुक्रवारी पक्षनेतृत्वाने रावत यांना राजीनामा देण्यास सांगितले होते. त्या आदेशानुसार रावत यांनी राज्यपालांकडे राजीनामा दिला आहे. पुढील वर्षी राज्यात विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर रावत यांचा राजीनामा महत्वाचा मानला जात आहे. नवा मुख्यमंत्री निवडण्यासाठी आज भाजप आमदारांची बैठक होणार आहे.
मुख्यमंत्री तीरथसिंह रावत यांनी शुक्रवारी रात्री ११ वाजता राजभवनावर जाऊन राज्यपाल बेबी रानी मौर्या यांच्याकडे आपला राजीनामा दिला. रात्री ९.३० वाजता बोलावलेल्या पत्रकार परिषदेत रावत यांनी त्यांच्या कार्यकाळात केलेल्या कामांबाबत माध्यमांना माहिती दिली. तीरथसिंह रावत यांच्याकडे ४ महिनेच मुख्यमंत्री पदाची जबाबदारी होती.
तीरथसिंग रावत यांनी राज्यपालांकडे राजीनामा दिल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला.मी माझा राजीनामा राज्यपालांना सादर केला आहे. घटनात्मक संकट पाहता मला राजीनामा देणे योग्य आहे असे वाटले. मला आतापर्यंत प्रत्येक संधी दिल्याबद्दल मी केंद्रीय नेतृत्व आणि पंतप्रधान मोदी यांचे आभारी आहे असे रावत यांनी म्हटले.