देहरादूनमध्ये पंतप्रधान मोदींची सभा – 18 हजार कोटींच्या प्रकल्पांच्या कार्याचा शुभारंभ
वृत्तसंस्था/ देहरादून
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शनिवारी उत्तराखंडमध्ये 18 हजार कोटी रुपयांच्या 11 प्रकल्पांच्या कार्याचा शुभारंभ केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तराखंडमधील भाजप सरकारसाठी ‘तप आणि तपस्ये’चा मार्ग सांगत या राज्यात विकासाची गंगा वाहत असल्याचे शनिवारी म्हटले आहे. मागील सुमारे 5 वर्षांमध्ये राज्यात 1 लाख कोटी रुपयांचे प्रकल्प वेगाने मूर्त रुप धारण करत आहेत. भारत आता आधुनिक पायाभूत सुविधांवर 100 लाख कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक करण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे मोदींनी म्हटले आहे.
या शतकाच्या प्रारंभी अटलबिहारी वाजपेयींनी भारतात संपर्कव्यवस्था वाढविण्याची मोहीम सुरू केली होती. पण त्यानंतर काँग्रेसच्या शासनकाळात 10 वर्षांपर्यंत देशात पायाभूत विकासाच्या नावावर घोटाळे झाले. यामुळे देशाला झालेल्या नुकसानाची भरपाई करण्यासाठी आम्ही दुप्पट वेगाने मेहनत करत आहोत असे उद्गार मोदींनी काढले आहेत.
नवे प्रकल्प या दशकाला उत्तराखंडचे दशक ठरविण्यात महत्त्वाची भूमिका बजावतील. दुहेरी इंजिन असलेल्या सरकारमुळे उत्तराखंडमध्ये विकासाची गंगा वाहत आहे. 5 वर्षांमध्ये केंद्र सरकारने उत्तराखंडसाठी 1 लाख कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या प्रकल्पांना मंजुरी दिली. राज्य सरकार या प्रकल्पांना वेगाने मूर्त रुप देत असल्याचे मोदींनी म्हटले आहे.
6 तासांचा प्रवास अडीच तासात
पंतप्रधानांच्या हस्ते काम सुरु झालेल्या प्रकल्पांमध्ये पर्यटन, रस्ते आणि पायाभूत सुविधांशी संबंधित अनेक प्रकल्प आहेत. यात 8,300 कोटी रुपयांचा दिल्ली-देहरादून इकॉनॉमिक कॉरिडॉर देखील आहे. यामुळे दिल्ली-देहरादून हा प्रवास 6 तासांऐवजी 2.5 तासांमध्ये पूर्ण होणार आहे. या कॉरिडॉरच्या निर्मितीनंतर उत्तरप्रदेशातील मुजफ्फरनगर, शामली, यमुनानगर, बागपत, मेरठ अणि बेरूत तसेच उत्तराखंडमधील हरिद्वारची संपर्कव्यवस्था उत्तम होणार आहे. तसेच हा आशियातील सर्वात लांबीचा (12 किलोमीटर) जंगलातून जाणारा एलिवेटेड कॉरिडॉर असेल. या कॉरिडॉरमध्ये वन्यप्राण्यांना त्रास होणार नाही याची खबरदारी घेतली जाणार आहे. या प्रकल्पात एक ग्रीनफील्ड अलाइमेंट प्रोजेक्टरही सामील असेल. याचबरोबर हरिद्वार रिंग रोड प्रकल्पही याच्या अंतर्गत पूर्ण केला जाणार आहे.
आधुनिक प्रकल्पांमध्ये ‘ऑल वेदर चारधाम’ प्रकल्पांचे काम अभूतपूर्व पद्धतीने होतेय. बद्रीनाथला जाणाऱया भाविकांच्या सुविधेसाठी आता लामबगडला भूस्खलन मुक्त करण्यात आले आहे. भूस्खलनामुळे भाविकांना कित्येक तासांची प्रतीक्षा करावी लागत होती. पण आता बद्रीनाथची यात्रा ‘सुरक्षित आणि सुखद’ होणार आहे. तर केदारनाथ धाममध्ये 2019 मध्ये भाविकांची संख्या दुप्पट झाली. पुनर्निर्मितीच्या कामामुळे भाविकांची संख्या वाढण्यासह स्थानिक लोकांसाठी रोजगाराच्या संधींमध्येही वृद्धी झाल्याचे मोदी म्हणाले.