अनेक स्थानी भूस्खलन, धरणांची पातळी वाढली, अतिदक्षतेचा इशारा
डेहराडून / वृत्तसंस्था
उत्तराखंड राज्यात परतीच्या मान्सून पावसाने धुमाकूळ घातला असून पूर, भूस्खलन आणि इमारती पडल्याने 23 जणांचा मृत्यू गेल्या दोन दिवसांमध्ये झाला आहे. रामगढ जिल्हय़ातील टल्ला हा भाग पूर्णतः पाण्याखाली गेला असून त्याचा राज्याशी संपर्क तुटला आहे. आपत्तीनिवारण दलाच्या तुकडय़ा अनेक स्थानी कार्यरत झाल्या असून लोकांना सुरक्षित स्थळी नेण्याचे कार्य सुरु आहे.
या भागातील अनेक घरांमध्ये पाणी शिरले असून लोकांना घरांच्या छपरांवर आश्रय घ्यावा लागला आहे. चमोली जिल्हय़ात बद्रीनाथ महामार्ग पाण्यामुळे बंद झाल्याने अनेक भाविक बद्रीनाथ येथेच अडकले आहेत. भूस्खलन झाल्याने हा महामार्ग बंद पडल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
केदारनाथ येथे प्रचंड वृष्टी
प्रसिद्ध तीर्थस्थळ केदारनाथ येथे रविवार पासून प्रचंड जलवृष्टी होत आहे. मंदाकिनी नदी दुथडी भरुन वाहू लागल्याने आसपासच्या गावांना पुराचा धोका निर्माण झाला आहे. तेथे पोहचलेले सर्व भाविक सुरक्षित आहेत. त्यांना तेथून हलविण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. गुजरातमधून 80 ते 100 भाविक केदारनाथ यात्रेला गेले असून त्यांच्या सुटकेचे प्रयत्न गुजरात सरकारकडून पेले जात आहेत. इतर राज्यातील भाविकांच्या सुटकेसाठीही प्रयत्न करु असे गुजरातच्या आपत्तीनिवारण मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.
भाविकांना आवाहन
केदारनाथ आणि बद्रीनाथ यात्रेला गेलेल्या भाविकांना आहे तेथेच थांबण्याचे आवाहन करण्यात आले. त्यांनी यात्रेचा पुढचा टप्पा पुढे ढकलावा अशी विनंती त्यांना अधिकाऱयांनी केली. लिंचौली येथे अनेक भाविकांच्या निवास आणि भोजनाची व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात आली आहे.