ऑनलाइन टीम / उत्तराखंड
उत्तराखंडमध्ये रविवारी रात्रीपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीने सलग तीन दिवस तडाखा बसला आहे. या पावसामुळे कुमाऊँ टेकड्यांच्या भागात पूर, भूस्खलनामुळे मालमत्तेचे प्रचंड नुकसान झाले आहे. उत्तराखंडमध्ये या आठवड्याच्या सुरुवातीला आलेल्या अतिवृष्टीनंतर मोठ्या प्रमाणात बचावकार्य सुरू झाले आहे. शुक्रवारी मृतांची संख्या ६८ वर पोहोचली असुन हा आकडा वाढण्याची शक्यता असल्याचे वृत्त पीटीआयने(PTI) दिले आहे.
हर्सील आणि लामखागा खिंडीजवळ दोन वेगवेगळ्या ट्रेकिंग ग्रुपचे सदस्य बेपत्ता असुन ते शोधण्यासाठी बचाव कार्य सुरू आहे. यापैकी सात ट्रेकर्सचे मृतदेह सापडले आहेत. हरसिलमध्ये बेपत्ता झालेल्या 11 ट्रेकर्सपैकी दोघांची सुटका करण्यात आली असून दोन जण बेपत्ता आहेत. तर लामखागा पासजवळ 11 ट्रेकर्स असलेल्या दुसऱ्या गटातील बेपत्ता झालेल्या आणखी पाच ट्रेकर्सचे मृतदेहही काढण्यात यश मिळाले आहे. असे उत्तराखंडचे डीजीपी अशोक कुमार यांनी एएनआय (ANI) या वृत्तसंस्थेला सांगितले.
रविवारीपासून सुरू असलेल्या या मुसळधार पावसाने विशेषत: कुमाऊँच्या टेकड्यांमध्ये मालमत्तेचे प्रचंड नुकसान झाले आहे. काल दि. २२ आक्टोबर पासुन पाऊस कमी झाला असुन भारतीय हवामान विभागाने (IMD) शनिवारी राज्यभर कोरडे हवामान राहण्याची शक्यता वर्तवली आहे. बागेश्वरच्या पिंडारी आणि काफनी हिमनदीजवळ अडकलेल्या सहा परदेशी पर्यटकांसह ६५ ट्रेकर्सना वाचवण्यात राज्य आपत्ती प्रतिसाद दलाला (SDRF) यश आले असुन पिथोरागढच्या दारमा व्हॅलीमधून आणखी 23 जणांची सुटका करण्यात आली आहे. आणखी एका बचावकार्यात एसडीआरएफच्या (SDRF) पथकांनी पिंडारी हिमनदीजवळील डवली येथून सहा परदेशी पर्यटकांसह 42 पर्यटकांची आणि काफनी ग्लेशियरमधून 23 पर्यटकांची सुटका केली असल्याचे बागेश्वरचे डीएम विनीत कुमार यांनी पीटीआयला (PTI)सांगितले.