राजस्थानात ‘सेफ हाउस’मध्ये असणार नव्या आमदारांचा तळ
उत्तराखंडमध्ये विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होण्यास आता मोजकेच दिवस शिल्लक राहिले आहेत. परंतु यापूर्वीच काँग्रेस पक्ष अखेरच्या क्षणी आमदारांचा घोडेबाजार होऊ नये म्हणून स्वतःच्या आमदारांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी प्रयत्न करत आहे. 10 मार्च रोजीच्या निकालात त्रिशंकू विधानसभेची स्थिती निर्माण झाल्यास पक्षाने काँगेसशासित राजस्थानच्या सेफ हाउसमध्ये उत्तराखंडच्या आमदारांना हलविण्याची तयारी सुरू केली आहे.
निकालाचा दिवस नजीक येताच काँग्रेस पक्ष अलर्ट मोडवर आला आहे. भाजपचा घोडेबाजाराचा इतिहास पाहता काँग्रेस पक्ष यंदा कुठलीच संधी देऊ इच्छित नाही. याकरता काही योजना आखल्या जात असून यात काँग्रेसच्या उमेदवारांना राजस्थानात पाठविण्याचा पर्याय सामील असल्याचे पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याने नाव न जाहीर करण्याच्या अटीवर सांगितले आहे.
सर्व उमेदवारांना प्रदेश नेतृत्वाकडून विशेष निर्देश देण्यात आले आहेत. भाजपच्या घोडेबाजारामुळे 2017 मध्ये पक्षाला नुकसान झाले आहे. परंतु यावेळी आम्ही तयार आहोत असे या नेत्याने म्हटले आहे. माजी मुख्यमंत्री आणि पक्षाचे राष्ट्रीय महासचिव हरीश रावत, उत्तराखंड काँग्रेसचे अध्यक्ष गणेश गोदियाल, विरोधी पक्षनेते प्रीतम सिंह यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ दिल्लीत काँग्रेस नेतृत्वाशी चर्चा करून सोमवारी परतणार आहे.
पक्षाच्या उमेदवारांवर आमचा पूर्ण विश्वास आहे. भाजपच्या संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर आमचे सर्व सदस्य देखील सतर्क आहेत. यंदा आम्ही भाजपला कुठलाच उलटफे करू देण्याची संधी देणार नसल्याचे गोदियाल यांनी म्हटले आहे. तर दुसरीकडे भाजपने काँग्रेसकडून होत असलेला घोडेबाजाराचा आरोप फेटाळून लावला आहे.