उत्तराखंड /प्रतिनिधी
उत्तराखंड येथील चमोली येथे हिमकडा कोसळून पर्वतातून वाहणाऱ्या नद्यांना आलेल्या प्रचंड पुरामध्ये १०० ते १५० जण वाहून गेल्याची भीती व्यक्त होत आहे, अशी माहिती उत्तराखंडचे मुख्य सचिव ओमप्रकाश यांनी दिली आहे.
दरम्यान तपोवनमध्ये एनटीपीसी आणि ऋषी गंगाचा प्रकल्प पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. संपूर्ण नदीच चिखलात परिवर्तीत झाली आहे. हा चिखल हळूहळू वाहत आहे. चमोली, देवप्रयाग आणि सर्व नद्यांच्या किनाऱ्यावर वसलेल्या गावांच्या प्रशासनाला याची माहिती देण्यात आली आहे. तिथं काम करणारे काही लोक जखमी झाले आहेत. मात्र, किती लोक या जलप्रलयात वाहून गेले किंवा कोणाला नुकसान झालं याची नेमकी माहिती अद्याप उपलब्ध होऊ शकलेली नाही.
या प्रकल्पात काम करणाऱ्या सुमारे ४० ते ५० बेपत्ता मजूरांना शोधण्यासाठी शोध मोहिम हाती घेण्यात आली आहे. आयटीबीपीचे १०० पेक्षा अधिक जवान बचावासाठी घटनास्थळी पोहोचले आहेत. सकाळी आठ ते नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून एनडीआरएफची टीम घटनास्थळाकडे रवाना झाल्या आहे. हिमकडा चमोली येथून हृषिकेशपर्यंत पोहचणार आहे त्यामुळे जोशीमठ, श्रीनगरपर्यंत हायअलर्ट जाहीर करण्यात आला आहे.
चमोली जिल्ह्यातील रेणी गावाजवळ हा हिमकडा कोसळला असून आपत्ती व्यवस्थापनची टीम घटनास्थळाकडे रवाना झाली आहे. या जलप्रलयात अनेक ग्रामस्थांची घर वाहून गेली आहेत. यामुळे धोली नदीला मोठा पूर आला आहे. तसेच नदीवरील ऋषी गंगा प्रकल्पाचं मोठ नुकसान झालं आहे.