ऑनलाईन टीम / देहरादून :
उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील जोशीमठाजवळच्या रेनी गावात मोठा हिमकडा कोसळल्याने धौलीगंगा नदीला महापूर आला आहे.महापुरात लष्कराला सीमाभागातील मलारीला जोडणारा पुलही वाहून गेला आहे. त्यामुळे लष्कराने आयटीबीपीच्या 200 जवानांना जोशीमठात पाठवलं असून, पूल बनवणारे लष्कराचे एक पथक घटनास्थळाकडे रवाना केले आहे.
हिमकडा कोसळल्याने अचानक आलेल्या पाण्याच्या प्रचंड प्रवाहाबरोबर 150 हुन अधिक जण वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. नदीकाठच्या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ऋषिगंगा वीजनिर्मिती प्रकल्प तसेच तपोवनमध्ये चमोली हायड्रो पॉवर प्रकल्पाचेही मोठे नुकसान झाले आहे.
घटनास्थळी एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या असून, नदीकाठी अडकलेल्या नागरिकांना हेलिकॉप्टरद्वारे बाहेर काढण्यात येत आहे.