ऑनलाईन टीम / देहरादून :
उत्तराखंड सरकारकडून एक आठवडा म्हणजेच 22 जूनच्या सकाळी 6 वाजेपर्यंत कोरोना कर्फ्यूमध्ये वाढ करण्यात आली आहे. मात्र, त्यातच दिलासादायक बाब म्हणजे सरकारने काही निर्बधांसह चारधाम यात्रा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. चारधाम यात्रा केवळ तीन जिल्ह्यांमध्येच सुरू केली जाणार आहे, अशी माहिती शासकीय प्रवक्ते सुबोध उनियाल यांनी सोमवारी दिली.
- 5 दिवस सुरू ठेवली जाणार ‘मिठाईची दुकाने’
ते म्हणाले, प्रदेशातील कोरोना कर्फ्यूमध्ये वाढ केली असली तरी काही बाबतीत सूट देखील देण्यात आली आहे. या अंतर्गत प्रदेशातील मिठाईची दुकाने आठवड्यातील 5 दिवस सुरू ठेवली जाणार आहे. तर अन्य दुकाने तीन दिवस उघडली जाणार आहेत. तर राजधानी देहरादूनमध्ये विक्रम, टेम्पो आणि सिटी बस देखील लवकरच सुरू केली जाणार आहेत.
- चारधाम यात्रेसाठी आरटीपीसीआर रिपोर्ट निगेटीव्ह जरूरी
यासोबतच लग्न समारंभात सहभागी होणाऱ्या संख्येत वाढ करण्यात आली असून आता 50 केली आहे. यासोबतच चारधाम यात्रा राज्यातील तीन जिल्ह्यांसाठी सुरू करण्यात आली आहे. यामध्ये चमोली, उत्तरकाशी आणि रूद्रप्रयाग जिल्ह्याचा समावेश आहे. मात्र, या यात्रेत सहभागी होणाऱ्या भाविकांची आरटीपीसीआर रिपोर्ट निगेटीव्ह असणे सक्तीचे करण्यात आले आहे. यासह राजस्व कोर्ट सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र एका दिवसात केवळ 20 केसेससाठी परवानगी असेल.
दरम्यान, पहिल्या प्रमाणेच सिनेमा हॉल, स्विमिंग पूल, शॉपिंग मॉल, जिम, स्टेडियम, मनोरंजन पार्क, सभागृह आणि बार अजूनही बंदच असणार आहेत.