भाजपकडून प्रचाराची पातळी घसरली
ऑनलाईन टीम/तरुण भारत
कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीची रंगत दिवसेंदिवस वाढत आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे आणि भाजपचे अनेक दिग्गज नेते प्रचारासाठी कोल्हापुरात येत आहेत. त्यामुळे निवडणुकीमधील चुरस वाढली आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांच्या प्रचारासाठी आज माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण कोल्हापुरात आहेत. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर सडकून टीका केली.
भाजपकडून प्रचाराची पातळी घसरली
यावेळी बोलताना अशोक चव्हाण म्हणाले, भाजपकडून प्रचाराची पातळी घसरली आहे. भाजप नेते जी काही वक्तव्य करत आहेत ती न शोभणारी आहेत. भाजपकडून खालच्या पातळीचे राजकारण होत आहे. निवडणूक ही निवडणूक असायला पाहिजे पण भाजपकडून प्रचाराची पातळी घसरली असून ही बाब चिंताजनक आहे. ते कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलत होते.
तसेच विरोधक जरी शिवसेनेची मते भाजपला मिळणार अशी वक्तव्य करत असली तरी या निवडणुकीत महाविकास आघाडी प्रामाणिकपणे एकत्रित काम करत आहे. शिवसेना महाविकास आघाडीसोबत असून ते देखील उमेदवार निवडून आणण्यासाठी चांगले प्रयत्न करत आहेत. त्यामुळे वेंगुर्लेची पुनरावृत्ती कोल्हापूर उत्तरमध्ये होईल, असा विश्वास यावेळी अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला.
धनंजय महाडिकांना अशी वक्तव्य न शोभणारी
यावेळी अशोक चव्हाण यांनी माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या वक्तव्यावरही सडकून टीका केली. धनंजय महाडिक यांनी भाजप उमेदवाराच्या सभेवेळी महिलांविषयी वक्तव्य केलं होतं. या वक्त्यव्याचा महाविकास आघाडीकडून निषेध करण्यात आला होता. धनंजय महाडिकांच्या या वक्तव्याचा समाचार घेताना अशोक चव्हाण यांनी धनंजय महाडिकांना अशी वक्तव्य करणे शोभत नाही. आजपर्यंत असं महिलांबाबत खालच्या पातळीवर जाऊन कोणीही बोललेले नाही त्यामुळे हे बोलणे कोल्हापूरला न शोभणारे आहे, असे ते म्हणले.
चव्हाण यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर सुरु असलेल्या कारवाईवर बोलताना भाजपवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, भाजप केंद्रीय यंत्रणांना हाताशी धरून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर कारवाई करत आहे. भाजप महाविकास आघाडीला अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे. पण तो सफल होणार नाही असे ते म्हणाले. तसेच देशात इंधन दरवाढ सुरू आहे. बेरोजगारीचे प्रमाण वाढत आहे. परराष्ट्र धोरणाचे तीन तेरा वाजले आहेत. याव्यतिरिक्त देशात अनेक समस्या असताना भाजप नेते यावर काही न बोलता मूग गिळून गप्प आहेत, अशी टीका यावेळी चव्हाण यांनी केली.
भाजप उत्तर नसून निरुत्तर
भाजपला सत्तेची लालसा लागली आहे. ज्या राज्यात भाजप सत्तेत नाही तिथे भाजप बिथरली आहे. त्यामुळे गल्लीपासून दिल्लीपर्यंत निवडणूक जिंकायच्या हा भाजपचा अट्टाहास आहे तो कधीही पूर्ण होणार नाही. त्यामुळे कोल्हापूर उत्तरेच्या निवडणुकीत भाजप उत्तर नसून निरुत्तर आहे, अशी टीका अशोक चव्हाण यांनी केली.
मराठा आरक्षणावर बोलताना अशोक चव्हाण यांनी भाजपवर सडकून टीका केली. भाजप सत्तेत असताना मराठा आरक्षण देऊ शकलं नाही. उलट भाजपने याबाबत लोकांची फसवणूक केली आहे. राज्य सरकारला अधिकार नसताना त्यांनी राज्य सरकारची दिशाभूल केली. जनतेची दिशाभूल केली. केंद्रात भाजप सरकार सत्तेत असताना भाजप आरक्षण देऊ शकली नाही, हे त्यांचे अपयश आहे. आरक्षण देणे हे राज्यसरकारच्या हातात नसूनही आम्ही प्रयत्न करत आहे. पण न्यायालयात त्याला स्थगिती मिळाली आहे.
संभाजीराजेंच्या मागण्यांवर राज्य सरकार सकारात्मक
खासदार संभाजीराजे छत्रपतींनी मराठा आरक्षण आणि अन्य मागण्यांसाठी केलेल्या आंदोलनावर बोलताना चव्हाण म्हणाले, संभाजीराजे यांनी ज्या मागण्यांसाठी आंदोलन केले. त्यांच्या अनेक मागण्यांवर राज्य सरकार सकारात्मक आहे. तसेच संभाजीराजेंच्या अनेक मागण्या पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
शरद पवारांच्या घरावर हल्ला निंदनीय
दरम्यान, शुक्रवारी मुंबईत शरद पवारांच्या घरावर एसटी कर्मचाऱ्यांनी चप्पलफेक आणि दगडफेक केली. यासंदर्भात पत्रकारांनी चव्हाण यांना विचारलं असता ते म्हणाले, शरद पवार यांच्या घरावर झालेला हल्ला हा वाईट आहे, ही गोष्ट निंदनीय आहे. अशा प्रकारचे हल्ले होणे हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला मारक आणि लोकशाहीला घातक आहे. त्यामुळे आंदोलन करताना कोणीही संयम सोडता कामा नये. ज्या काही एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या आहेत त्या सोडविण्यासाठी राज्यसरकार प्रयत्न करत आहे. एसटी जर तोट्यातून बाहेर निघाली तर सगळे प्रश्न सुटतील. परंतु एसटी तोट्यात ठेऊन कोणती गोष्ट करता येणार नाही, असही ते यावेळी म्हणाले.
भेटायला गेले म्हणजे तक्रार करायला गेले असे नाही
राज्यातील काँग्रेसच्या २५ आमदारांनी सोनिया गांधींना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. तसे पत्रही सोनिया गांधींना पाठविले होते. यावर हे २५ आमदार नाराज असल्याचं बोललं जात होतं. यावर बोलताना चव्हाण म्हणाले, कोणताही आमदार पक्षश्रेष्टींना भेटायला गेला म्हणून तक्रार करायला गेले असे होत नाही. ते त्यांचे प्रश्न घेऊन गेले असतील. काँग्रेसमध्ये कोणताही आमदार नाराज नाही असे अशोक चव्हाण म्हणाले.