वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
येत्या जुलै-ऑगस्ट दरम्यान होणाऱया टोकियो ऑलिंपिक स्पर्धेतून कोरोना महामारी समस्येमुळे उत्तर कोरियाने माघार घेण्याचा निर्णय जाहीर केल्याने आता भारताची महिला वेटलिफ्टर मिराबाई चहनूला पदक मिळविण्याची आशा निर्माण झाली आहे. टोकियो ऑलिंपिक स्पर्धा 23 जुलै ते 8 ऑगस्ट दरम्यान होणार आहे.
टोकियो ऑलिंपिक पात्रतेच्या मानांकनात भारताची महिला वेटफ्लिटर आणि माजी विश्वविजेती मिराबाई चानू 49 किलो वजनगटात चौथ्या स्थानावर आहे. वेटलिफ्टींग या क्रीडाप्रकारात चानूची अव्वल प्रतिस्पर्धी म्हणून उत्तर कोरियाची रि साँग गम हिला ओळखले जाते. 2019 साली झालेल्या विश्व वेटलिफ्टींग स्पर्धेत उत्तर कोरियाच्या रि साँगने 204 किलो वजन उचलत चानूला तिसऱया स्थानावर फेकले. चानूने 201 किलो वजन उचलत या स्पर्धेत कास्यपदक मिळविले. टोकियो ऑलिंपिक स्पर्धेतून उत्तर कोरियाने माघार घेतल्याने चानूला यावेळी पदकाची आशा निर्माण झाली आहे. 2016 च्या रिओ ऑलिंपिक स्पर्धेत चानूची कामगिरी निराशाजनक झाली होती. उझ्बेकमध्ये 16 ते 25 एप्रिल दरम्यान होणाऱया आशियाई वेटलिफ्टींग स्पर्धेत मणिपूरची 26 वर्षीय मिराबाई चानू सहभागी होणार आहे.