पिळगावचे माजी सरपंच, काँग्रेस नेते महेश वळवईकर यांचा आपमध्ये प्रवेश
प्रतिनिधी /पणजी
पिळगावचे माजी सरपंच तथा मये गट युवा काँग्रेस समितीचे माजी उपाध्यक्ष महेश वळवईकर यांनी आज पणजी येथे आप नेते वाल्मिकी नाईक यांच्या उपस्थितीत आम आदमी पक्षात प्रवेश केला. वळवईकर यांच्यासह गेल्या काही दिवसात उत्तर गोव्यातील नेते आणि कार्यकर्ते आपमध्ये सामील झाले आहेत. यामुळे ज्या मतदारसंघात भाजप सुरक्षित आहे, तिथेच आम आदमी पक्ष आपली पकड मजबूत करत आहे.
माजी सरपंच आणि पंच राहिलेले वळवईकर, पिळगावातील अनेक धार्मिक आणि सांस्कृतिक संघटनांचे नेते आहेत. केजरीवाल मॉडेल आणि महामारीच्या काळात आपच्या निःस्वार्थ कार्यामुळे प्रभावित होऊन ते पक्षात सामील झाले आहेत. भाजप सरकार सामान्य माणसाची काळजी करत नाही, असे म्हणत महेश वळवईकर यांनी सांगितले, की भाजप काळात विकास कामे अपूर्ण राहिली आहेत आणि योजना तर केवळ कागदावरच आहेत.
“मी आपमध्ये सामील झालो, कारण केजरीवाल मॉडेल हे देशातील एकमेव मॉडेल आहे, जे सामान्य माणसाला मदत करत आहे. आज भाजप सरकारला गरीब किंवा सामान्य माणसाची पर्वा नाही. लोकांच्या घरात पाणी नसल्याने त्यांची हर घर जल योजना अपयशी ठरली आहे. महागाई वाढली आहे आणि गोवेकरांना दैनंदिन जीवन जगणेच अशक्मय झाले आहे. या कठीण काळात फक्त आपनेच रेशन पुरवले आणि गोवेकरांना मदत केली.” असे महेश वळवईकर म्हणाले.
“आज आमचे युवक बेरोजगार आहेत, गेल्या 10 वर्षांपासून खाणी बंद आहेत. सर्व खाण अवलंबितांची स्थिती भयंकर कठीण आहे. 9 वर्षे खाणी सुरू करण्यात अपयशी ठरलेला भाजप 3 महिन्यांत खाणी पुन्हा कशा सुरू करणार?” असा.सवाल त्यांनी उपस्थित केला.
यावेळी आप नेते वाल्मिकी नाईक म्हणाले, की “गोव्याच्या प्रत्येक गावातील लोक आपमध्ये सामील होत आहेत. कारण त्यांना समजले आहे, की आप हेच गोव्याचे एकमेव भविष्य आहे. आप हा एकमेव पक्ष आहे, ज्याचा अजेंडा सामान्य गोवेकरांचे जीवन सुधारण्यास मदत करू शकतो. मयेमध्येच गेल्या आठवडय़ात म्हावळींगेच्या गावकऱयांनी आमदार आणि मुख्यमंत्री दोघांचा हुसकावले . भाजप किती निरुपयोगी आहे, हे गोवेकरांना समजले आहे.