ऑनलाईन टीम/तरुण भारत
पाच राज्यातील निवडणुकांचा निकाल नुकताच लागला आहे. यामध्ये पाचही राज्यात काँग्रेसचा दारुण पराभव झाला आहे. काँग्रेसला ताब्यात असणारे पंजाब राज्यही गमवावे लागले. दरम्यान, या पराभवानंतर काँग्रेसने पराभवाचे आत्मचिंतन करायला सुरुवात केली आहे. यासाठी काँग्रेसने बैठकांचे सत्र सुरूच ठेवले आहे. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधींनी बैठक घेत पराभव झालेल्या पाच राज्यातील प्रदेशाध्यक्षांना राजीनामे देण्याचे आदेश दिले होते. यांनतर प्रदेशाध्यक्षांनी राजीनामेही दिले. पण आता उत्तर प्रदेश निवडणुकीची संपूर्ण जबादारी असणाऱ्या प्रियांका गांधींचा मात्र राजीनामा घेतलेला नाही. आता त्यांच्या राजीनाम्याची एका काँग्रेस नेत्याने मागणी केली आहे.
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसच्या पराभवासाठी जबाबदार असलेल्यांवर कारवाईची मागणी आता करण्यात येत आहे. पराभवानंतर पक्षाने सहा वर्षांसाठी हाकलून दिलेला झिशान हैदर यांनी प्रियंका गांधी वड्रा यांच्या राजीनाम्याच्या मागणी केली आहे. झिशान हैदर यांनी मंगळवारी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून प्रियंका गांधी वड्रा यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना उद्देशून झिशान हैदर यांनी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस आणि उत्तर प्रदेशच्या प्रभारी प्रियंका गांधी वड्रा यांना ४०३ जागा देऊनही झालेल्या पराभवाला जबाबदार धरले आहे. झिशान हैदर म्हणाले की, याआधीही जेव्हा-जेव्हा राज्यात निवडणुकीचे निकाल वाईट आले, तेव्हा उत्तर प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि प्रभारी दोघांनीही राजीनामा दिला आहे. अध्यक्ष अजय कुमार लल्लू यांनी राजीनामा दिला आहे, आता प्रियंका गांधी वड्रा यांनीही राजीनामा द्यावा. प्रियंका गांधी वढेरा यांच्या कार्यकर्त्यांमुळे काँग्रेसची अवस्था बिकट होत असल्याचा आरोप झिशान यांनी केला. आता त्यांनी राजीनामा द्यावा असे झिशान हैदर म्हणाले.