हिंसाचारची चौकशी करण्यासाठी सहा सदस्यांच्या एसआयटीची स्थापना
लखनौ / वृत्तसंस्था
उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथील हिंसाचार प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने सहा सदस्यांच्या विशेष अन्वेषण दलाची (एसआयटी) स्थापना केली आहे. मंगळवारी संध्याकाळी ही घोषणा करण्यात आली. लखीमपूर खेरी येथे भाजपच्या केंद्रीय मंत्र्याच्या मुलाच्या वाहन ताफ्यातील एका कारने चार शेतकऱयांना धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतरच्या हिंसाचारात भाजपचे तीन कार्यकर्ते आणि कारचा चालक हे मारले गेले आहेत.
मृत शेतकऱयांच्या परिवारांना भेटण्यासाठी काँगेस नेत्या प्रियांका गांधी यांनी लखीमपूर खेरी येथे जाण्याचा प्रयत्न केला होता. तथापि, जमावबंदी आदेशामुळे त्यांना तेथे जाऊ देण्यात आले नव्हते. 30 तासांच्या स्थानबद्धतेनंतर आता त्यांना अटक करण्यात आली असून न्यायालयासमोर उपस्थित करण्यात येणार आहे.
अतिथी गृहातच कारागृह
प्रियांका गांधी यांना अतिथी गृहात स्थानबद्ध करण्यात आले होते. तथापि आता या अतिथीगृहाच्या खोलीचे कारागृहात रुपांतर करण्यात आले आहे. काँगेस नेते पी. चिदंबरम यांनी ही अटक हुकुमशाही पद्धतीची असल्याचा आरोप केला. नाराज काँगेस कार्यकर्त्यांनी अतिथीगृहाबाहेर सरकारविरोधात निदर्शने केली.
मृत शेतकऱयांवर अंत्यसंस्कारास तयारी
या हिंसाचारात मृत झालेल्या शेतकऱयांवर अंत्यसंस्कार करण्यास त्यांच्या नातेवाईकांनी प्रथम नकार दिला होता. त्यांच्या शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर आणि केंद्रीय मंत्र्यांच्या पुत्राविरोधात एफआयआर दाखल केल्यानंतरच अंत्यसंस्कार केले जातील, अशी अट त्यांनी घातली होती. मात्र नंतर त्यांच्याशी चर्चा करण्यात आली. त्यानंतर त्यांनी अंत्यसंस्कार करण्याची तयारी दर्शविली.
मंत्र्याला डच्चू देण्याची मागणी
केंद्रीय मंत्री अजय मिश्र यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्याची मागणी प्रियांका गांधी यांनी केली आहे. तसेच त्यांच्या पुत्राला त्वरित अटक का केली नाही, असा प्रश्न त्यांनी उत्तर प्रदेश सरकारला विचारला आहे. प्रियांका गांधी यांना भेटण्यासाठी सीतापूर येथे जाणारे छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनाही मज्जाव करण्यात आला होता. त्यामुळे त्यांनी मंगळवारी लखनौ येथे चार तास धरणे धरले. नंतर ते छत्तीसगड मध्ये परतले आहेत.
व्हिडीओ प्रदर्शित
लखीमपूर खेरी येथे झालेल्या घटनेचा व्हिडीओ काँगेस नेत्या प्रियांका गांधी यांनी प्रसिद्ध केला आहे. त्यात कारमधून उतरुन पळून जाताना एक युवक दिसत आहे. तोच केंद्रीय मंत्री अजय मिश्र यांचा पुत्र आहे, असा दावा काँगेसने केला. त्याला त्वरित अटक करण्याची मागणी करण्यात आली. मात्र, आपण घटनास्थळी नव्हतोच असा दावा मंत्रीपुत्राने केला आहे. आपण तो सिद्ध करु शकतो असेही त्याचे म्हणणे आहे. कारचा चालक हिंसाचारात मारला गेला असल्याने हा प्रकार कसा घडला आणि कार शेतकऱयांच्या अंगावर कशी गेली याचा पुरावाच नष्ट झाला आहे, अशीही चर्चा आहे. आता एसआयटीच्या चौकशीतून सत्य बाहेर येऊ शकेल, अशी शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.