ऑनलाईन टीम
आगामी होवू घातलेल्या उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाचले नसले तरी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. काँग्रेसने युपीत आपली सत्ता पुन्हा मिळवण्यासाठी मोर्चेबांधणी देखील सुरु केली आहे. तर शिवसेनेनेही १०० जागा लढवण्याचा निर्धार केला आहे. भाजपने देखील आपली सत्ता कायम राखण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.
यातच काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्या उत्तर प्रदेशातील वाढत्या सक्रियतेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याने मोठं विधान केलं आहे. “आम्ही प्रियांका गांधी यांना लवकरच उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून घोषित करू शकतो”, असं विधान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनी केलं आहे.
दरम्यान, यापूर्वी काँग्रेसने उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी एक प्रोमो प्रसिद्ध केला आहे. ज्यात प्रियांका गांधी यांचा उल्लेख ‘उत्तर प्रदेशची आशा’ असा केला गेला आहे. तर, एक ‘प्रतिज्ञा यात्रा’ काढण्याची देखील घोषणा केली आहे. प्रियांका गांधी यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून तब्बल १२ हजार किलोमीटर इतका लांबचा प्रवास केला जाणार असल्याची घोषणा केली आहे. या यात्रेला “काँग्रेस प्रतिज्ञा यात्रा: हम वचन निभाएंगे” असं नाव देण्यात आले आहे.