ऑनलाईन टीम
उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये काल, रविवारी विविध ठिकाणी वीज कोसळली. यात तब्बल ४९ जणांचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशमधील एकूण ३० जणांचा प्राण गेला. यामध्ये प्रयागराजमध्ये १४, कानपूर देहातमध्ये पाच तर कौशंबीमध्ये चार जणांचा मृत्यू झाला. फिरोझाबादमध्ये तीन आणि उन्नाव तसेच चित्रकूटमध्ये प्रत्येक दोन जणांना मृत्यू झाला.
राजस्थानमध्येही वीज पडल्याने १९ जणांचा मृत्यू झाला. त्यापैकी ११ जणांचा मृत्यू हा एकट्या जयपूरमध्ये झाले. तर, १७ जण जखमी झाले. जयपूर, ढोलपूर, कोट्टा आणि जहालवार जिल्ह्यांमध्ये काल मान्सूनचं दमदार आगमन झाले.
या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या लोकांच्या कुटुंबियांना प्रशासनाने आवश्यक ती सर्व मदत करावी आणि योग्य ती नुकसानभरपाई द्यावी असे आदेश उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले आहेत. तर, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर केली आहे. जखमींनाही मदत करण्याचे आदेश देखील दिले आहेत. राजस्थानमध्ये घडलेल्या या घटनांसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी ट्विटरवरुन शोक व्यक्त केला.
राजस्थानमधील आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास जोरदार पावसाला सुरुवात झाली. याचदरम्यान अंबर किल्ल्याजवळ रविवारी सायंकाळी वीज पडल्याची घटना घडली. त्यामध्ये ११ जणांचा मृत्यू झाला तर १२ जण जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन विभागाचे जवान आणि स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयामध्ये दाखल केले.