लोकसभा निवडणुकीत भाजपचा वरचष्मा ः तृणमूलच्या दणका देण्याच्या तयारीत
उत्तर बंगालमध्ये भाजप तसेच तृणमूल काँग्रेस या दोन्ही पक्षांकडून आता अप्रत्यक्ष स्वरुपात धार्मिक मुद्दय़ांच्या अवतीभोवतीच प्रचार करण्यात आला आहे. मागील लोकसभा निवडणुकीवेळी स्थिती अशीच होती. या भागात लोकसभेचे 8 मतदारसंघ आहेत. तृणमूल काँग्रेसला येथे खातेही उघडता आले नव्हते. भाजपने 7 तर काँग्रेसने एक जागा जिंकली होती. उत्तर बंगालच्या 54 विधानसभा मतदारसंघांपैकी 34 ठिकाणी भाजपला आघाडी मिळाली होती.
या भागात तृणमूल काँग्रेसला प्रारंभापासूनच मोठे बळ मिळाले नव्हते. मागील विधानसभा निवडणुकीत (2016) 26 तर 2011 मध्ये 16 जागा मिळाल्या होत्या. तर 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालामुळे भाजपमध्ये उत्साह दिसून आला आहे. तर तृणमूलने भाजपला पराभूत करण्यासाठी पूर्ण शक्ती पणाला लावली होती.
ममता बॅनर्जींच्या मुस्लिमांना तृणमूल काँग्रेससाठी एकजूट होण्याच्या आवाहनाचा उल्लेख करत भाजपने परस्परविरोधी ध्रूवीकरणाचा प्रयत्न केल्याचे मानले जाते. ममतांच्या विरोधात निवडणूक लढविणारे शुभेंदु अधिकारी तसेच भाजपचे अन्य नेते ममता विजयी झाल्यास त्या नवा बांगलादेश तयार करतील असे म्हणत आले आहेत.
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गोरखा समुदायाला गोरखपूर आणि महान संत गोरखनाथ यांच्याशी जोडले. 250 किलोमीटरच्या कक्षेत एका राज्यात दोन स्वतंत्र राज्यांची मागणी होत असलेला हा देशातील एकमात्र भाग आहे. पर्वतीय क्षेत्रात ‘गोरखालँड’ आणि मैदानी क्षेत्रात ‘ग्रेटर कूचबिहार’ राज्याची मागणी होत असते.
भावनात्मक मुद्दय़ांवरही भर
कूचबिहारचा राजवंशी समुदाय असो किंवा राजवंशी भाषा आणि येथील कामतापुरी भाषा, मतुआ समुदाय, नाश्य शेख समुदाय असो किंवा 11 जातींना अनुसूचित जमातीचा दर्जा देण्याची घोषणा पाहता सर्वत्र भावनात्मक मुद्देच दिसून आले आहेत. मुस्लीमबहुल मालदा, मुर्शिदाबाद, उत्तर दिनाजपूरमध्ये सीएए, एनआरसी मोठा मुद्दा आहे. बांगलादेशी घुसखोरांना विरोध दर्शवून भाजप मतांच्या ध्रुवीकरणास यशस्वी ठरल्याचे चित्र आहे. याच्या प्रत्युत्तरादाखल तृणमूलनेही ध्रूवीकरणाचाच आधार घेतला आहे.