राजस्थान, पंजाब, हरियाणा, मध्यप्रदेशात पिकांची नासाडी
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
एकीकडे भारत कोरोनाशी झुंजत असतानाच आता टोळधाडीचे संकट उद्भवले आहे. पाकिस्तानात हाहाकार माजविलेल्या या टोळधाडीने आता भारतात प्रवेश केला असून पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि मध्यप्रदेशात पिकांची व वनस्पतींची नासाडी होत आहे. लक्षावधींच्या संख्येने आलेले त्यांच्या तडाख्यात सापडलेली पिके फस्त करीत आहेत. मात्र, ही धाड रबी पिकांचा हंगाम संपत आल्यानंतर पडल्याने हानीचे प्रमाण कमी आहे, असे मत कृषी क्षेत्राशी संबंधित तज्ञांनी व्यक्त केले.
साधारणतः चार इंच लांबीचे हे टोळ हिरव्या वनस्पतींवर जगतात. त्यांची संख्या अनेक लाखांच्या घरात असल्याने पिकांवर व झाडांवर त्यांचा थर बसलेला दिसतो. अक्षरशः काही तासांमध्ये हे टोळ शेकडो एकर जमिनीवरील पिके खाऊन ती उजाड करून टाकतात. शेतकरी पारंपरिक मार्गांनी या टोळांना नष्ट करण्यात गुंतले आहेत. अनेक राज्यांनी त्यांच्यावर औषध फवारून त्यांना मारण्याचा प्रयत्न चालविला आहे. तथापि हे प्रयत्न तोकडे पडताना दिसत आहेत.
उत्तर प्रदेशातही प्रवेश
दोन दिवस हरियाणा आणि पंजाबमध्ये धुमाकूळ घालून आता टोळधाड उत्तर प्रदेशात थडकली आहे. तर दक्षिणेत ती महाराष्ट्राच्या काही भागांमध्येही पोहचली आहे. विविध मार्गांचा अवलंब करून ही टोळधाड रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे. पश्चिम उत्तर प्रदेश हा गहू आणि उसाचा पट्टा म्हणून ओळखला जातो. तेथे आता टोळांची झाडे व पिकांचा नाश करण्यास सुरवात केली आहे.
तरीही हानी मर्यादित
रबी पिकांची कापणी झाल्यानंतर टोळधाड आल्याने ती बऱयाच प्रमाणात वाचली आहेत. आता शेतकरी पुढच्या खरीप हंगामाची तयारी करीत आहे. त्यामुळे पुष्कळशी शेते सध्या रिकामी आहेत. काही ठिकाणी अद्याप उन्हाळी पिके कापणीच्या प्रतीक्षेत उभी आहेत. परिणामी, टोळधाड मोठी असली तरी तिच्यामुळे झालेली हानी मर्यादित राहिली आहे. आता पुढचे खरीप पीक या टोळधाडीपासून वाचविण्यासाठी प्रयत्न करण्यास पुरेसा अवधी हाती आहे.