वार्ताहर/ निपाणी
महागाई नवनवे उच्चांक गाठत आहे. जीवनावश्यक वस्तूची दरवाढ सामान्य ग्राहकांचे बजेट कोलमडण्यास कारण ठरत आहे. अशातच सध्या सर्वत्र सौंदत्ती यात्रेला जाण्यासाठी भाविकांची लगबग सुरू झाली असतानाच नारळाचे भाव गगनाला भिडले आहेत. यामुळे या भाववाढीचा फटका भाविकांना बसत आहे.
सौंदत्ती यात्रेनिमित्त बाजारपेठेत नारळाची मागणी वाढली आहे. घरगुती व हॉटेल वापरासाठीही ग्राहकांतून नारळाची मागणी कायम असते. निपाणी बाजारपेठेत प्रामुख्याने केरळ, मंगळूर परिसरातून नारळाची आवक होते. पण अतिवृष्टी व रोगांचा प्रादुर्भाव यामुळे उत्पन्नात घट झाली आहे. याचाच परिणाम म्हणून उत्पन्न घटताच नारळाचे भाव वाढल्याचे व्यापारीवर्गातून सांगण्यात येत आहे. गेल्या महिन्यात नारळ विक्री प्रति नग 15 ते 20 रुपये प्रमाणे होत होती. दर वाढल्याने आता नारळ विक्री 18 ते 25 रुपये याप्रमाणे होत आहे. मागणी वाढताना दरही वाढल्याने ग्राहकवर्गातून संताप व्यक्त होत आहे. दररोजची वाढती महागाई कमी कधी होणार? असा सवालही पुढे येत असून महागाई रोखण्यासाठी शासनाने पाऊल उचलणे गरजेचे आहे, असे मत आता सर्वसामान्य नागरिकांतून व्यक्त होत आहे.