सलग तीन महिने पीएमआय राहिला 50 अंकांवर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशाच्या आर्थिक स्थितीत सुधारणांचे वारे वाहताना दिसत आहेत. बाजारातील वाढती मागणी व उत्पादनांतील तेजीमुळे आर्थिक स्थितीत सुधारणा होत आहे. सप्टेंबरमध्ये विविध कंपन्यांनी आपल्या उत्पादनांमध्ये कपात केली होती. या वातावरणातही केलेली कामगिरी ही सकारात्मक असल्याचे अभ्यासकांनी स्पष्ट केले आहे.
आयएचएस मार्केटचा मॅन्युफॅक्चरिंग परचेजिंग मॅनेजर्स इंडेक्स(पीएमआय) सप्टेंबर महिन्यात 53.7 वर राहिला आहे. जो ऑगस्टमध्ये 52.3 वर राहिला होता. सलगपणे हा इंडेक्स तिसऱया महिन्यात 50 अंकांच्या वर राहिला आहे.
रेपोदरासह सरकारी खर्चाचे सहाय्य
अभ्यासकांच्या माहितीनुसार अर्थव्यवस्थेमध्ये प्राप्त झालेली तेजी ही आगामी काही महिने सुरु राहणार असल्याचे संकेत आहेत. सदरची रिकव्हरी ही कमी केलेला व्याजदर आणि सरकारकडून सलगपणे मिळत असणारे सहाय्य यांचा हा परिणाम असल्याचेही म्हटले आहे.
विदेशातून मिळाल्या ऑर्डर
रिझर्व्ह बँकेने सध्यातरी आर्थिक वर्षापर्यंत व्याजदरात वाढ केलेली नाही. यासह विविध कंपन्यांना विदेशातील बाजारातून प्राप्त झालेल्या ऑर्डरीमुळे सकारात्मक स्थिती प्राप्त करण्यास कंपन्यांना यश मिळाले आहे.