कोणतीही गोष्ट मोफत मिळत असल्यास त्याचे मोल राहत नाही. कोरोना लसीच्या दुसऱया डोसच्या घटणाऱया आलेखाबाबत तसेच म्हणावे लागेल. सण-उत्सवाच्या काळात तब्बल 75 लाख नागरिकांनी दुसरा डोस टाळल्याची माहिती मिळत आहे. ही उत्सवी बेफिकिरीच म्हणावी लागेल, जी वैश्विक महामारीच्या काळात कोणालाच परवडणारी नाही.
कोरोना रुग्णसंख्या आणि मृत्यू दर घटत असताना सरकारकडून होणारा लसीचा तगादा प्रत्येकाला जाचक वाटत आहे. त्यामुळेच सणउत्सवांच्या काळात दुसऱया डोसचा दिवस आला असताना देखील 75 लाख म्हणजे सुमारे पाऊण कोटी लोकांनी दुसरा डोस टाळला. 75 लाख जणांनी दुसरा डोस टाळला म्हणजे त्यांना पुन्हा कोरोना संसर्ग होण्याची भिती वाढली तसेच दुसऱयांना संसर्गित करण्यास ते तत्पर झाले असा तज्ञांचा अंदाज आहे. आधीच लस तुटवडा असताना प्रयत्न करुन लसीचा साठा मुबलक करण्यात येत आहे. मात्र तरी देखील दुसऱया डोससाठी टाळाटाळ करणे म्हणजे कोरोनाबाबत अज्ञान आणि चुकीचा आत्मविश्वास लोकांमध्ये अजूनही आहे का असा प्रश्न पडावा.
लसीकरणातील माहितीनुसार चार महिन्यापूर्वी होती तशी लसीसाठी मागणी सध्या राहिली नाही. मात्र लस महत्वाची असल्याने सरकारने देखील दारोदारी जाऊन लस देण्याची योजना सुरु केली आहे. सरकारी लसीकरण केंद्रांवर लस घेऊ इच्छिणारे कमी संख्येने येऊ लागले असून तर खासगी लसीकरण केंद्रांवरदेखील तसेच चित्र आहे. लस मोफत देणे, वस्त्या-वसाहतींमध्ये लोकांपर्यंत जाऊन लसीकरण मोहिमा चालविणे, यासारखे प्रयोग लसीकरणाला प्रोत्साहन देणारे उपक्रम आहेत. मात्र समाजातूनच लस टोचून घेण्याची उत्सुकता कमी होत असल्याचे निरीक्षण मांडण्यात येत आहे. राज्यात 72 टक्के जणांनी पहिला डोस घेतला आहे. तर 32 टक्के जणांनी दुसरा डोस घेतला आहे. म्हणजेच पहिल्या डोसवरच कोरोनावरील विजयी उत्सव साजरा करण्याची मनस्थिती निर्माण होऊ लागली आहे. जी फसवी ठरू शकते. डोस पूर्ण करणाऱयांची संख्या प्रत्येक जिल्हानिहाय वेगवेगळी आहे. रविवारपर्यंत 9 कोटी 80 लाख 89 हजार 958 जणांचे लसीकरण झाले आहे. असे असताना डोस पूर्ण केलेल्या लोकांना कोरोना संसर्ग झालेला दिसून आला आहे.
हा मुद्दा लक्षात घेता डोस अर्धवट घेतलेल्या नागरिकांकडून किंवा कोरोना वर्तणूक न पाळणाऱयांकडून लस घेऊनही कोरोना संसर्ग पसरत आहे का की म्युटंट, स्ट्रेन बदलत आहे का या सारख्या प्रश्नांनी डोकं वर काढलं आहे. मात्र लसीकरण वेगाने झाल्यास तसेच संपूर्ण डोस नेमून दिलेल्या कालावधीत घेतल्यास कोरोनावर नियंत्रण वेगाने होऊ शकते. तसेच बदलत्या म्युटंट आणि स्ट्रेनवर नियंत्रणही येऊ शकते असे राज्य कोरोना टास्क फोर्स याचे मत आहे. सध्या लोकांमध्ये कोरोना आणि लसीकरण विषयात नकारात्मक आत्मविश्वास वाढत आहे. यावर वारंवार जागरुकता करुनदेखील महत्व पटवून घेण्यास शिथिलता दिसून येते. त्यात सर्व निर्बंध उठत असताना कोरोना संपूर्ण गेला अशीच धारणा झाल्याने पहिल्या नंतरच्या दुसऱया डोसची हेळसांड केली जात आहे. कोरोना नियंत्रणात आला तरी लसीकरणाबाबतची बेपर्वाई नकोय. लसीकरण अधिकाधिक लोकसंख्येने लवकरात लवकर पूर्ण करावे. शिवाय कोरोनाला नेस्तनाबूत करावयाचे असल्यास बुस्टर डोसच्या दिशेने जाण्यास हरकत नाही. लसीकरणाबाबत सतत जागरुकता आणली जात आहे. मात्र या जागरुकतेबाबत उलटा प्रचारदेखील केला जात असल्याची खंत काही तज्ञ बोलून दाखवत आहेत. दरम्यान आता लसीकरणासाठी त्यात दुसऱया लसीसाठी लोकांनी सण उत्सवांची कारणे न देता आवर्जून लस केंद्रावर जाऊन डोस घ्यावेत असे आवाहन केले जात आहे.
आता पर्यंत 3 कोटी 09 लाख 43 हजार 876 जणांनी संपूर्ण लसीकरण केले आहे. तर 6 कोटी 71 लाख 46 हजार 82 जणांनी आतापर्यंत पहिला डोस घेतला असल्याचे आकडेवारी सांगते. यातील फरक काढल्यास 3 कोटी 62 लाख 02 हजार 206 एवढा येतो. दरम्यान सण-उत्सव सुरु झाल्यापासून 75 लाख जणांनी दुसरा डोस टाळला असल्याचे सरकारी आकडेवारी सांगते. हा दुसरा डोस अत्यंत महत्वाचा असून तो घेतल्यास लसीकरण पूर्ण होऊ शकते. कोरोना महामारीला संपवायचे असल्यास संपूर्ण लोकसंख्येचे संपूर्ण लसीकरण गरजेचे आहे.
सध्याची घटती कोरोना रुग्णसंख्या आणि मृत्यू हे लसीकरण यशस्वी होत असल्याचे लक्षण असून निर्बंध शिथिल होत आहेत. दोनच दिवसापूर्वी मुंबई सारख्या दाट लोकवस्तीच्या शहरात मृत्यू दर सर्वात कमी नोंदविण्यात आला. त्याचवेळी रुग्ण संख्या कमी होत आहे. मात्र तरीही आठवडय़ाचे मृत्यू 30 ते 32 या संख्येत होत असल्याचे तज्ञ जाणीव करुन देतात. ही संख्या मोठी असल्याचा इशाराही देतात. त्यामुळेच दोन्ही डोस महत्वाचे आहेत. सध्या कमी होणारी रुग्णसंख्या हे चित्र दिवाळी नंतरही असेच राहिल्यास निर्बंधमुक्त जीवनाचा विचार करण्यात येईल.
दरम्यान, दुसरा डोस चुकवल्याच्या वृत्ताने तज्ञ चिंतिंत होत आहेत. त्यामुळेच कमी होणारी रुग्णसंख्या म्हणजे कोरोनाचा शेवट जवळ आला असे कोणताही तज्ञ सध्या तरी विश्वासाने म्हणताना दिसत नाही. कोरोनाची रुग्णसंख्या शून्य झाल्यावरदेखील आगामी काही महिने कडक कोविड वर्तणूक नियम पाळावे लागणार आहेत. सध्या कोरोना चाचण्या होऊनही रुग्ण वाढत नसल्याचे दिसून येते. यावर लसीकरणाला महत्व दिले जात आहे. कोरोना नियंत्रणात येणे, मृत्यू रुग्णसंख्या कमी होत जाणे असे असले तरीही होणाऱया लसीकरणाचे प्रमाण निर्बंध मुक्तीसाठी कळीचा मुद्दा ठरणार आहे. त्यासाठी दिवाळीत काळजी घेण्याची गरज आहे. लसीकरण पूर्ण करुन दुहेरी मास्क लावूनच बाहेर पडा असा सल्ला दिला जात आहे. मुंबईतील लसीकरण चांगले झाले असले तरीही राज्यातील लसीकरणाला वेग घेणे गरजेचे आहे.
राज्यातील सात कोटी लोकसंख्या दोन्ही डोस घेणे बाकी आहेत तर पाच कोटी लोकसंख्या पहिला डोस घेणे बाकी आहे. अशा स्थितीत सुरु झालेली †िदवाळी त्याला लागून येणारे ग्रामीण जत्रा, पालख्या आणि इतर उत्सव यात लसीकरणाला महत्व देणे आवश्यक आहे. त्यामुळेच कोरोना कमी होत असला तरीही उत्सवाच्या काळात लसीकरणाबाबत बेफिकीरी केली गेल्यास महागात पडेल, यात शंका नाही.