पंतप्रधान नरेंद्र मोदींचे उद्गार : जागतिक युवा कौशल्य दिन : सरकारचे जोरदार प्रयत्न
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी डिजिटल कॉन्क्लेव्हला संबोधित केले आहे. देशाच्या तरुण-तरुणींना जगाच्या गरजांविषयी अचूक माहिती देण्याचा प्रयत्न केला जात आहे. प्रत्येक लहानमोठे कौशल्य आत्मनिर्भर भारताची मोठी शक्ती ठरणार आहे. कौशल्य वाढविण्यासाठी नवनव्या संधी शोधत राहणे हेच यशस्वी माणसाचे लक्षण असते. नव्या गोष्टी शिकत राहिल्याने जीवनात उत्साह निर्माण होत असल्याचे उद्गार मोदींनी काढले आहेत.
कौशल्याबद्दलचे आकर्षण बळ आणि उत्साह प्रदान करते. कौशल्य केवळ पैसे कमाविण्याचे साधन असून जीवनात उत्साह निर्माण करण्याचंही साधन आहे. भारताच्या तरुणाईला अन्य देशांच्या गरजांसंबंधी योग्य आणि अचूक माहिती मिळावी असा प्रयत्न आहे. कुठल्या देशात, कुठल्या क्षेत्रात कोणत्या संधी आहेत याची माहिती तरुणाईला जलदपणे मिळणे गरजेचे आहे. जगाला खलाशांची सर्वाधिक गरज आहे. आम्ही जगाला लाखो खलाशी पुरवू शकतो आणि स्वतःच्या सागरी अर्थव्यवस्थेलाही बळकट करू शकतो, असे मोदी म्हणाले.
देश बळकट करू
काही दिवसांपूर्वी देशातील श्रमजीवींच्या कौशल्याचे आकलन करणारे एक पोर्टल सुरू करण्यात आले आहे. हे पोर्टल कुशल श्रमजीवींची ओळख पटवून त्यांना संधी पुरविण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. पोर्टलमुळे रोजगारप्रदात्याला एका क्लिकसरशी कुशल कामगारांपर्यंत पोहोचता येणार आहे. लहान-मोठे सर्वप्रकारचे कौशल्य आत्मनिर्भर भारताची अत्यंत मोठी शक्ती ठरणार असल्याचे मोदी यांनी म्हटले आहे.
कुशलतेचा अभाव
दरवर्षी 15 जुलै रोजी जागतिक युवा कौशल्य दिवस साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रसंघाकडून मान्यताप्राप्त या कार्यक्रमाद्वारे तरुण-तरुणींच्या रोजगार आणि उद्योजकतेवर भर दिला जातो. तसेच वर्तमान आणि भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आवश्यक कौशल्याच्या महत्त्वावर लक्ष केंद्रीत केले जाते. भारताच्या कार्यबळात केवळ 2.3 टक्के लोकांकडे रोजगारासाठी आवश्यक कौशल्य आहे.