उदगाव / वार्ताहर
उदगाव परिसरामध्ये गव्यांचे दर्शन झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण झाले असून वन विभागाने तत्काळ याचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे. रविवारी आणि सोमवारी कोथळी, उमळवाड परिसरात व उदगाव येथील रेल्वे स्टेशन जवळील शेती परिसरात तीन रानगव्यांचे दर्शन झाले आहे त्यामुळे उदगांव परिसरात शेतकर्यांच्यात भितीचे वातावरण पसरले आहे.
रविवारी कोथळी परिसरात गव्यांनी ऊस व भाजीपाला शेतीत चांगला धुडगुस घातला. त्यानंतर गव्यांनी उमळवाड परिसरात उच्छाद मांडला. अखेर सोमवारी सकाळी, उदगांव येथील सांगली-कोल्हापूर बायपास महामार्गालगत रेल्वे भरावावरून उदगाव गावाच्या दिशेने आले आहेत.
उदगांव येथे उमळवाड मार्गावर असलेल्या शितल चौगुले यांच्या ऊसाच्या शेतात या गव्यांनी धुडगुस घातला आहे. लागणी केलेल्या ऊस शेतात गव्याने आसरा घेतला असल्याचे शेतकर्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे उदगांव, उमळवाड, कोथळी, जयसिंगपूर रेल्वे स्टेशन या परिसरातील शेतकर्यांनी सावधगिरी बाळगावी असे आवाहन करण्यात आले आहे.