प्रतिनिधी/ सातारा
कोरोना महामारीत लॉकडाऊन नको म्हणून खासदार उदयनराजेंनी दहा दिवसांपूर्वी साताऱयात पोवई नाक्यावरील आंब्याच्या झाडाखाली बसून भीक मांगो आंदोलन केले होते. त्या आंदोलनावेळी साडे चारशे रुपयांची भीक सरकार जमा करण्यासाठी दिली होती. सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी ती भिक जमा करुन न घेता त्यांना साभार परत पाठवून दिली आहे. ही रक्कम त्यांनी मनीऑर्डरने खासदार उदयनराजेंच्या पत्त्यावर पाठवून दिली आहे. ही रक्कम मनिऑर्डर करुन पाठवल्याने खासदार उदयनराजे आता नेमकी काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.
कोरोना महामारीत राज्य सरकारने अंशतः लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतल्यानंतर खासदार उदयनराजे भोसले यांनी आक्रमक होवून सातारा शहरात दि. 10 रोजी भिक मांगो आंदोलन पोवई नाका येथील आंब्याच्या झाडाखाली केले होते. या सरकारमध्ये मंत्री मोठा भ्रष्टाचार करत आहेत. वाझेला पैसे गोळा करायला लावत आहेत. भ्रष्टाचार बोकळला आहे. इथे माणसांचा जीव जावू लागला आहे, अशी टीप्पणी करत खासदार उदयनराजेंनी गोळा केलेली साडे चारशे रुपयांची भीक जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदारांच्याजवळ दिली. लॉकडाऊन मागे घ्यावेच लागेल.उद्यापासून नो लॉकडाऊन. लॉकडाऊन ठेवल्यास भडका उडेल, असा इशारा दिला होता. त्याचवेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्यावरही टीप्पणी केलेली होती. ते म्हणाले होते की माझ्या आयुष्या असला बेकार कलेक्टर कधी पाहिला नव्हता, अशा शब्दात टीका केली होती. त्यांनी जिल्हाधिकाऱयांकडे राज्य सरकारकडे देण्याकरता दिलेले साडे चारशे रुपये जिल्हाधिकाऱयांनी खासदार उदयनराजेंना साभार परत केले. तेही मनीऑर्डरने आणि त्यासोबत दोन ओळीचे पत्र पाठवले आहे. त्यामध्ये आपण दिलेले रक्कम कायदेशीररित्या स्वीकारता येणार नाही, असे म्हटले होते. त्यामुळे आता खासदार उदयनराजे हे नेमका काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.