उदयनराजेंना जिल्हा बँकेत येवूच न देण्यासाठी राष्ट्रवादीची व्युहरचना
प्रतिनिधी/ सातारा
जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस सोमवार दि. 25 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत असून सोमवारी खासदार उदयनराजे, आमदार जयकुमार गोरे यांच्यासह राष्ट्रवादी पॅनेलचे विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार शिवेंद्रराजे, आमदार शशिकांत शिंदे अशी दिग्गज मंडळी आपला अर्ज दाखल करणार आहेत. तसेच काही हौसे, गवसेही अर्ज दाखल करणार आहेत.
दरम्यान, जिल्हा बँकेत खासदार उदयनराजेंना येवूच न देण्यासाठी राष्ट्रवादीने व्युहरचना शनिवारच्या पुण्यातल्या बैठकीत केल्याची राष्ट्रवादीच्या गोटात जोरदार चर्चा आहे. तर भाजपाचे आमदार शिवेंद्रराजे यांनी त्यांच्या विरोधात दोन उमेदवार शोधलेत ते कोण?, अशीही चर्चा सुरु आहे. दरम्यान, उदयनराजे राष्ट्रवादीचा व्युहरचना कशी भेदणार अन् जिल्हा बँकेत कसा प्रवेश करणार याकडे सगळय़ांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत आता रंग भरु लागला आहे. अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस राहिला असून राष्ट्रवादी काँग्रेसकडून मात्र ही निवडणूक एकतर्फी काढण्यासाठी आटोकाट प्रयत्न सुरु केलेला आहे. विरोधकांना जिल्हा बँकेची पायरी सुद्धा चढू द्यायची नाही असे मनसुबे आखले गेले आहेत. त्याकरता तब्बल दोन वेळा पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक पार पडली. अजितदादांच्या उपस्थितीत शनिवारच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे मिशन जिल्हा बँक ठरले आहे. त्या बैठकीमध्ये भाजपाचे आमदार शिवेंद्रराजे हेही होते. राष्ट्रवादीचे विरोधक असलेले खासदार उदयनराजे यांना बँकेत येवूच द्यायचे नाही त्यासाठी मतांची गोळाबेरीज त्यांनी पडताळून पाहिली तर राष्ट्रवादीच्या कोटय़ात जास्त मते आहेत. त्या अनुषंगाने व्युहरचना तयार झाली आहे. आता सोमवारी अर्ज दाखल करायच्या शेवटच्या दिवशी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी अर्ज दाखल केल्यानंतर सर्वच राष्ट्रवादीचे नेते मंडळी आपले अर्ज दाखल करणार आहेत.
दुसऱया बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसने टाकलेली व्युहरचना भेदण्यासाठी खासदार उदयनराजेंनी कोणती व्यूहरचना तयार केलेली आहे हेही सोमवारी दुपारी अर्ज दाखल झाल्यानंतर समजणार आहे. त्यामध्ये अद्यापही खासदार उदयनराजे, आमदार जयकुमार गोरे आणि खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर या तिघांची भूमिकाच स्पष्ट झाली नाही. तर राष्ट्रवादी पॅनेलचा अभ्यासही चांगला सुरु आहे.
कोणी गाडी दिली तर कोण जाणार सहलीवर रंगू लागल्या चर्चा
सोसायटीच्या चेअरमनाना आणि ज्यांना मताचा अधिकार आहे त्यांची पाच वर्षातून एकदाच चांदी होत असते. जिल्हा बँकेची निवडणूक आता रंगात आली असून सोसायटींची 956 मते आहेत. ही मते अन्य कोणाकडे वळू नयेत म्हणून कोणाला सहलीवर न्यायाचे वचन तर कोणाला गाडी दिल्याची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. त्यामुळे जिल्हा बँकेची निवडणूक मतदारांसाठी दिवाळी तर उमेदवारांसाठी दिवाळं काढणारी आहे, अशीही चर्चा रंगत आहे.
पोलीस बंदोबस्त असण्याची शक्यता
अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस सोमवारी आहे. अर्ज भरण्यासाठी सर्वच इच्छूक मंडळी व त्यांचे कार्यकर्ते जिल्हा बँकेत येणार असल्याने गर्दी होण्याची शक्यता आहे. त्याच अनुषंगाने निवडणूक निर्णय अधिकारी मनोहर माळी यांनी कर्मचाऱयांची संख्या आणि बंदोबस्तासाठी पोलीस कर्मचारीही मागवतील असे समजते.