ऑनलाइन टीम / पुणे :
भाजप नेते आणि माजी खासदार उदयनराजे यांनी पत्रकार परिषद घेऊन पुस्तक वादाबाबत आपलं मत व्यक्त केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना करण्यावरुन भाजप नेते उदयनराजे भोसले यांनी नाराजी व्यक्त करत संताप व्यक्त केला आहे.
ते म्हणाले, जाणता राजा फक्त शिवाजी राजेच आहेत. महाराजांशी कोणाचीही तुलना होऊ शकत नाही, महाराजांशी तुलना करणं अत्यंत चुकीचं आहे. लोकांनी बुद्धी गहाण ठेवली आहे का ? असा प्रश्न पडतो असं यावेळी उदयनराजे यांनी म्हटलं.
ते म्हणाले, महाराजांसोबत तुलना होईल इतकी जगात कोणाचीही उंची नाही असंही यावेळी त्यांनी सांगितलं. जेव्हा तुम्ही कोणलाही ही उपमा देत असता तेव्हा विचार करायला हवा, असं म्हणत उदयनराजे यांनी शरद पवार यांचं नाव न घेता टीका केली.
महाआघाडीवर टीका करताना ते म्हणाले, महाआघाडीतून ‘शिव’ नाव का काढलं गेलं ? महाराजांच्या नावाचं आजपर्यंत फक्त राजकारण करण्यात आलं आहे. सोयीप्रमाणे राजकारण केलं जात आहे. शिववडा नावाचा वडापाव सुरु करण्यात आला. शिवाजी महाराजेंचे नाव वडापावला देता? शिवसेना नावावर आम्ही कधी हरकत घेतली नाही. स्वार्थासाठी एकत्र आलेली सत्ता फार काळ टिकू शकत नाही.