अध्याय बारावा
बाराव्या अध्यायामध्ये सत्संगाचा महिमा अगाध असल्याचे निरूपण आहे. तेथे कर्माचा कर्ता कोण आणि कर्मत्यागाचे स्वरूप काय, ह्यांचे निरूपण आहे. अकरावा अध्याय संपविताना तू माझा अत्यंत लाडका असून माझ्यासारखाच आहेस म्हणून मी तुला माझे गुपित सांगेन असे देवांनी उद्धवाला म्हंटले होते. जेव्हा एकमेकांशी अत्यंत जवळीक असते तेव्हाच एकमेकांना आपापली गुपिते सांगितली जातात. ‘गुह्य सांगेन’ असे देवांनी म्हंटल्यावर ते ऐकण्याकरिता उद्धव हा श्रीकृष्णाच्या मुखाकडे पाहू लागला. आता हा कोणत्या गुह्य गोष्टी सांगेल ? ह्याच्या ओठातून कोणत्या गुप्त गोष्टी बाहेर पडतील ? असा विचार मनात येऊन उद्धव सावध होऊन बसला. भगवंतांचे बोल ऐकण्याची उद्धवाच्या अंतःकरणाला अत्यंत उत्कंठा लागली होती. ज्याप्रमाणे मेघाच्या मुखातील पाणी चातक वरच्यावरच झेलून घेतो, त्याप्रमाणे कृष्णाचा शब्द झेलण्यासाठी उद्धवानेही आपले तोंड पसरले. ज्ञेय, ज्ञाता आणि ज्ञान जणण्यासाठी उद्धव लक्ष देऊन राहिला. भक्ताविषयी कृपाळू व अत्यंत उदार असा श्रीकृष्ण आपल्या गुह्य गोष्टीतील तात्पर्य सांगू लागला. भगवंत म्हणाले, मला वश करून घेण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न सुरू असतो. त्यासाठी जो तो आपापल्या परीने खटाटोप करत असतो पण जगातली निरनिराळी शास्त्रे त्यात अपयशी ठरतात. कारण मला प्राप्त करून घेण्यासाठी मला काय आवडते याचा कुणी विचारच करत नाहीत. या सर्वांचे कष्ट पाहून मला फार वाईट वाटते. लोक त्यांच्या त्यांच्या मतानुसार सर्व प्रयत्न करत असतात पण त्यांचे प्रयत्न वाया जातात. तुला ऐकून आश्चर्य वाटेल पण अष्टांगयोगामध्येही मला वश करून घेण्याचे सामर्थ्य नाही. जगातील नित्यानित्यविचारसुद्धा आपण होऊन माझ्यापर्यंत येऊ शकत नाही.
किंवा निरंतर मनामध्ये प्रकृतिपुरुषांचा विचार करीत राहिले तरी माझ्या स्थानापर्यंत पोहचण्याचे सामर्थ्य त्या माणसाला प्राप्त होत नाही. अहिंसेसहित सर्व धर्म, तसेच सत्य, यांच्या योगानेही मी प्राप्त होत नाही. वेदाध्ययन हे मुख्य समजतात पण ते सर्व वेद सांगोपांग पठण केले, तरीही माझी प्राप्ती होत नाही. मग त्यांच्यापुढे बिचाऱया तपांचा काय पाड ? पंचाग्निसाधनाचा प्रकार तर निरर्थक आहे. कृच्छ्रचांद्रायणे तर वेडी ठरली. कारण ती करूनही मी प्राप्त होत नाही. जो घरदार सोडून विरक्त होतो किंवा ‘विरजा’ (संन्यास घेण्यापूर्वी करावयाचा होम) होम करून त्यात आपल्या सर्वस्वाचे हवन करतो, सर्व साधनात अत्यंत श्रे÷ असा संन्यास जो घेतो, त्यालाही मी परमेश्वर वश होत नाही. श्रौतस्मात कर्में करता करता कर्मठ लोक वेडे झाले तरीही मी त्यांना सापडत नाही. होम करताना बिचाऱयांना कष्ट मात्र भोगावे लागतात. गाई दान दिल्या, भूमि दान दिली, तिलदान दिले किंवा सर्व धनधान्याचे दान दिले, तरीही त्यांचा दानाभिमान सुटल्याशिवाय मी त्यांना वश होत नाही. संकष्टचतुर्थी, ऋषिपंचमी, विष्णुपंचक, बुधाष्टमी इत्यादि अनेक व्रते नित्य नेमाने केली, तरी त्या कर्मांमध्ये मी सांपडत नाही. सर्वस्व खर्च करून अश्वमेध व राजसूय यज्ञ यथासांग केले, तरी त्यांच्या योगाने मी श्रीकृष्ण कांही वश होत नाही. तलाव, विहिरी, बागा, तयार केल्या, मार्गांवर झाडे लावली, वनामध्ये पांथस्थांच्या विश्रांतीकरिता अनेक विश्रांतिस्थाने तयार केली किंवा हवी तितकी स्मार्त कर्में आचरण केली तरीही मी आत्माराम काही भेटत नाही. अनेक प्रकारचे वेदमंत्र असोत, अनेक प्रकारचे गुप्तमंत्र असोत किंवा अत्यंत विचित्र अशी विधिविधाने असोत व त्यांचे सामर्थ्य केवढेही मोठे व कितीही पवित्र असो, तरी ती माझी प्राप्ती करून देण्यास स्वतंत्र रीतीने समर्थ होत नाहीत. पुष्कर इत्यादि नानाप्रकारची तीर्थें आहेत आणि पातके नाश करण्याविषयी ती अत्यंत समर्थ आहेत, तरी तत्काल माझ्यापर्यंत पोहोचवण्याचे सामर्थ्य त्यांच्या ठिकाणी असत नाही. जे कोणी रात्रंदिवस यमनियम करतात, नानाप्रकारची साधने करता थकून जातात, पण त्यांना माझ्या दारापर्यंत आणण्याचे सामर्थ्य त्या यमनियमादिकात असत नाही. कारण त्याना माझ्या वैकुंठाला येण्याचा मार्गच सापडत नाही. क्रमशः