अध्याय अकरावा
भगवंत उद्धवाला त्यांच्या अत्यंत आवडत्या विषयावर म्हणजे भक्त आणि भक्ती याबद्दल सांगत आहेत. ते म्हणाले, उत्तम भक्तांचे लक्षण हेच की, ते संकल्पाशिवायच अन्नपानादि मला अर्पण करतात. जे माझ्या ठिकाणी ध्रुवाप्रमाणे अढळ भजनशीळ असतात, त्यांना माझी स्थिर व अत्यंत अढळ अशी भक्ति प्राप्त होते. आर्त, जिज्ञासु आणि अर्थार्थी या तीन प्रकारच्या भक्तांना जी भक्ती प्राप्त होत नाही, ती माझी चौथी भक्ति त्यांना माझ्यावरील उत्कट प्रेमामुळे प्राप्त होते. आर्त भक्त आपली पीडा दूर व्हावी म्हणून मला भजत असतो, जिज्ञासु भक्त आपल्याला ज्ञानप्राप्ती व्हावी म्हणून भजत असतो, तिसरा अर्थार्थी भक्त माझे भजन करून आपल्याला यथेच्छ पैसा मिळावा अशी इच्छा करतो. ह्याशिवाय ज्ञानी म्हणून चौथा असतो त्याच्या ठिकाणी अशा कल्पनांचा मागमूसच नसतो. त्याला भक्तीमध्ये अत्यंत आवडीने चहूंकडे जेथे तेथे मीच मी सापडत असतो, त्याला तशी स्थिति माझ्या भजनानेच प्राप्त होते. संकल्प केल्याशिवायच सर्व आपोआप मला अर्पण होणे, हे चवथ्या भक्तीचे लक्षण आहे. त्याने जे जे कर्म करावे तीच माझी पूजा, तो जे जे बोलतो तोच माझा जप, त्याने जे जे पहावे तेथे त्याला माझेच पवित्र दर्शन होत असते. त्याचे चालणे तीच माझी यात्रा, तो जे जे भक्षण करतो तेच यज्ञात मला अर्पिलेली आहुति होते. त्याची निद्रा तीच माझी समाधि. याप्रमाणे त्याचे सर्व कर्म सहजच मला अर्पण होते. उद्धवा ! ही सनातन चौथी भक्ति त्याला पूर्णपणे लाभते. यालाच भागवती भक्ती म्हणतात. भागवती भक्ती करणाऱया भक्तांच्यामुळेच माझ्या अनेक प्रकारच्या अवतारमालिका होत असतात. देव, देवी वगैरे सर्व ह्याच भक्तीमुळे भासमान होतात. अशी निश्चळ भक्ति पूर्वापार चालत आलेली आहे. उद्धवाने भागवती भक्तीबद्दल ऐकल्यापासून त्याला ती कशी प्राप्त होईल हे जाणून घेण्याची उत्सुकता लागली होती. त्याची उत्सुकता जाणून भगवंत म्हणाले, उद्धवा ! ही अशी माझी भक्ति कशाने प्राप्त होईल असे विचारशील, तर भक्तिभावाने सत्संगती धरली असता माझी भक्ति प्राप्त होते. त्यासाठी मुख्यत्वेकरून संतांची सेवा हेच साधन देवाला आवडते. ते साधन घडेल तेंव्हा संतवचनाप्रमाणेच तो आत्मभाव आणि आत्मभक्ति देत असतो. आणखीन ऐक, ज्याला सत्संगतीच्या मेळात राहाणे आवडते, जो साधुवचनासाठी अत्यंत भुकेलेला असतो. साधूच्या मुखातून बाहेर पडलेला शब्द अमान्य करणे हे ज्याला माहीत नाही, तोच आत्मभक्तीचा पायाळू म्हणजे भाग्यवान होय. साधुवचनावर अत्यंत श्रद्धा आहे असा त्याचा निश्चयी स्वभाव पाहूनच त्यावर सद्गुरु कृपा करतो. साधु हा चराचरांमध्ये श्रे÷ गुरु आहे. खरोखर गुरूवाचून संसारापासून तारणारा दुसरा कोणी नाही. गुरुवचनाने भक्तांना आत्मभक्ति देणारा सर्वस्वी मीच आहे. संसारात जो सद्गुरु असेल, त्याची आज्ञा मी शिरसावंद्य मानतो. तो ज्याच्यावर कृपा करतो, त्याचा मी तत्काळ उद्धार करतो. सद्गुरूच्या ठिकाणी माझे स्वरूप आहे असे जाणून जो भजन करतो, तो मला किती आवडतो हे मीही सांगू शकत नाही. त्याचा इहलोक आणि परलोक दोन्ही मीच चालवतो. त्याच्यामुळे मला अत्यंत आनंद होतो, आणि तो आनंदी झाला की, माझ्याही आनंदाला भरते येते. त्याला गुरूने जो मार्ग दाखविलेला असतो, तो चालताना त्याला मुळीच प्रयास व श्रम पडत नाहीत. जर काही संकटे आली. तर मीच त्याच्यासमोर धावत जातो व आपले सर्वांग पुढे करतो. तो ज्या पदाला जाणार ते पदच मी त्याच्यापाशी आणितो. संतसेवा करणाऱयांवर ईश्वर किती प्रेम करतो ते श्रीकृष्ण सांगत आहेत. भगवंतांचे बोलणे ऐकून उद्धव भारावून गेला. त्याला सद्गुरु, साधू पुरुषांविषयी अत्यंत आदर वाटू लागला. त्याने मनात म्हटले की, असे साधु पुरुष ओळखण्यासाठी त्यांचे स्वरूपही विचारावे. त्यांच्या भेटीसाठी कराव्या लागणाऱया भक्तीचे लक्षण तरी कोणते? भजन करण्याची खूण तरी कोणती ? हे सर्व उद्धवाने भगवंतांनाच विचारायचे ठरवले.
क्रमशः