ऑनलाईन टीम / मुंबई :
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी विधानभवनात ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, परिवहन मंत्री अनिल परब, राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे, अमोल मिटकरी आदी उपस्थित होते.
विधान परिषदेच्या 9 जागांसाठी 21 मे रोजी निवडणूक होणार आहे. कालच महाविकास आघाडीच्या बैठकीत काँग्रेस उमेदवाराने माघार घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध होणार आहे. विधान परिषदेच्या 9 जागांसाठी महाविकास आघाडीला 5 तर भाजपला 4 जागा आहेत. आज महाविकास आघाडीतील शिवसेनेच्या आणि राष्ट्रवादीच्या प्रत्येकी दोन उमेदवारांनी अर्ज दाखल केले. यामध्ये शिवसेनेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेना उपनेत्या निलम गोऱ्हे, राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे आणि अमोल मिटकरी यांनी विधिमंडळाचे सचिव राजेंद्र भागवत यांच्याकडे आपले उमेदवारी अर्ज सोपवले.
काँग्रेसचे उमेदवार राजेश राठोड हे दीड वाजता अर्ज भरणार आहेत. तर भाजपचे उमेदवार डॉ. अजित गोपछडे, प्रवीण दटके, गोपीचंद पडळकर आणि रणजितसिंह मोहिते पाटील यांनी 9 मे रोजीच आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.