प्रतिनिधी / कोल्हापूर
राज्यातील वीज बिलाचा प्रश्न असो अथवा मराठा आरक्षणाचा. राज्य सरकारचे कोणतेही स्पष्ट धोरण नाही. मंत्रिमंडळाचे नेतृत्व करणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यकारभाराला कोणतीही दिशा दिलेली नाही. त्यांना प्रश्न समजावून घ्यावे असे वाटत नाही. कारण उद्धव ठाकरे यांचा जन्म पक्ष, संघटना चालवण्यासाठी झाला आहे, राज्य चालविण्यासाठी नाही, अशी टिका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. मराठा आरक्षण प्रश्नाबद्दल बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
चंद्रकांत पाटील म्हणाले, वीज बिलामध्ये सवलत देण्याची तयारी ऊर्जामंत्री नितिन राऊत यांनी दाखवली. पण अजित पवार यांनी विरोध केला. अशा वेळी मुख्यमंत्र्यांनी सामोपचाराने मार्ग काढून सवलत देणे आवश्यक होते. पण त्यांनी यामध्ये लक्षच घातले नाही. मराठा आरक्षणाबद्दलही असेच आहे. मुख्यमंत्री हा मंत्रीमंडळाचा नेता असतो. जो सर्वांना एका दिशेने नेतो. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोणतीही दिशा नाही. प्रश्न समाजावून घेण्याची त्यांची तयारी नाही. प्रशासनावर त्यांची पकड नाही. मुळात उद्धव ठाकरे यांचा जन्म पक्ष चालवण्यासाठी झाला आहे. सरकार चालवण्यासाठी नाही. मुंबई महापालिकेची निवडणूकही त्यांनी कधी लढवली नाही. मुंबई महानगरपालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांना काम केले नाही. त्यांना प्रशासन कसे चालते हे कसे समजणार ? राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सरकार चालवतील असे काही जणांना वाटत होते. मात्र ते तरी सरकारकडे लक्ष देतात काय ? हा देखील एक प्रश्नच आहे.
संजय राऊत यांनी धमक्या देणे बंद करावे
शिवसेनेच्या आमदाराची ईडीमार्फत चौकशी सुरु झाल्यानंतर आता संजय राऊत यांनी भाजपच्या 120 नेत्यांची नावे ईडीकडे कळवणार असल्याचे सांगितले आहे. याबाबत बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, राऊत यांनी आम्हाला अशा धमक्या देण्याचे बंद करावे. ते भाजप नेत्यांची नावे ईडीकडे कळवणार असतील तर त्यांना रोखले आहे कोणी ? कंगना राणावतचे त्यांनी घर पाडले त्यावेळी त्यांना कोणी रोखले काय ? त्यांचे आम्ही हात, पाय बांधलेले नाहीत असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला.
बाळासाहेबांनी सरकारबाहेर राहून अंकूश ठेवला
शिवसेना प्रमूख बाळासाहेब ठाकरे यांनी कधीही निवडणूक लढवली नाही. पण त्यांनी सरकार बाहेर राहून सरकारवर अंकूश ठेवला. सरकारच्या माध्यमातून लोकांचे प्रश्न सोडवले. नेता म्हणून त्यांची भूमिका अत्यंत योग्य आहे. समाजाचा अंकूश सरकारवर असला पाहीजे असेही चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.
अजित पवारांना तरी कुठे आमदार राखता आले ?
भाजपाकडे असणारे 105 आमदार टिकवण्यासाठी ते महाविकास आघाडीचे सरकार पडणार असल्याचे भाकीत करतात अशी टिप्पणी अजित पवार यांनी केली आहे. त्यासंदर्भात बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, आमचे आमदार कसे टिकवायचे ते आम्ही पाहतो. पण अजित पवारांना तरी कुठे आमदार राखत आले ? असा उपरोधीक टोला लगावत त्यांनी अप्रत्यक्षरित्या 23 नोव्हेंबर 2019 च्या शपथविधीची आठवण करून दिली.
पुणे पदवीधर वनवे, शिक्षक मतदारसंघही ताब्यात घेणार
पुणे विभागीय शिक्षक मतदारसंघाचे भाजपा आघाडीचे उमेदवार संग्राम देशमुख हे मोठ्या मताधिक्याने निवडणूक जिंकतील. तर शिक्षक मतदारसंघातही भाजपचा उमेदवार बाजी मारेल असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.