ऑनलाईन टीम / मुंबई :
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विश्वासू आणि जोगेश्वरी पूर्वचे आमदार रवींद्र वायकर यांची मंगळवारी ईडीकडून तब्बल आठ तास चौकशी करण्यात आली. विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या एक दिवस आगोदर ही चौकशी झाल्याने या कारवाईसंदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि रवींद्र वायकर यांनी पदाचा गैरवापर करत 2014 मध्ये अलिबागमध्ये जमीन खरेदी केली. त्यानंतर ही जमीन त्यांनी पत्नी रश्मी ठाकरे आणि मनिषा वायकर यांच्या नावे हस्तांतरीत केली, असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. तसेच या जमीन खरेदी व्यवहारात गैरव्यवहार झाल्याची तक्रार सोमय्या त्यांनी 3 मार्चला रेवदंडा येथील पोलीस ठाण्यात दाखल केली होती. जमिनींच्या दस्तऐवजात छेडछाड तसेच, वन कायद्याचा भंग, वनजमिनीवर अतिक्रमण करण्यात आल्याचा दावाही सोमय्या यांनी तक्रारीत केला होता. तसेच निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात दोन्ही नेत्यांनी या मालमत्तांचा उल्लेख टाळल्याचे सोमय्या यांनी म्हटले होते. या प्रकाराबद्दल वायकर दाम्पत्याने सोमय्या यांच्यावर 100 कोटींचा मानहानीचा दावाही ठोकला आहे.