मुंबई \ ऑनलाईन टीम
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचं आज सकाळी ११ च्या सुमारास मुंबई विमानतळावर आगमन झालं. यावेळी तिथपासूनच नारायण राणे यांनी आपल्या जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात केली. यावेळी बोलताना नारायण राणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. उद्धव ठाकरे नावाप्रमाणेच राज्याला उद्ध्वस्त करायला निघाले आहेत, असं म्हणत नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. यावेळी देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार यांच्यासह भाजपचे राज्यातील प्रमुख नेतेमंडळी देखील नारायण राणेंच्या स्वागतासाठी उपस्थित होते.
यावेळी बोलताना नारायण राणे यांनी मंत्रिपद दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आशीर्वादाने मी केंद्रीय मंत्रिमंडळात सहभागी झालो आहे. मी मोदी, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांचा ऋणी आहे की त्यांनी मला दिल्लीत मंत्रिमंडळात जाण्याची संधी उपलब्ध करून दिली, असं ते म्हणाले.
यावेळी नारायण राणे यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, उद्धव ठाकरे नावाप्रमाणेच राज्याला उद्ध्वस्त करायला निघाले आहेत. म्हणून जनता आशेचा किरण म्हणून राज्यात भाजपाची सत्ता यावी अशी अपेक्षा ठेऊन आहे. त्यामुळेच यात्रेला उपस्थिती दिसत असल्याचे ते म्हणाले.
भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेला जनतेचा मोठा प्रतिसाद मिळतो आहे. राज्यात इतर ठिकाणी मंत्र्यांची आधीच जन आशीर्वाद यात्रा सुरू झाली आहे. परत भाजपची सत्ता यावी म्हणून या यात्रेसाठी मोठ्या प्रमाणात जनता उपस्थित आहे. गर्दी भरपूर करा, पण कोरोनाचे नियम पाळा असेही राणे म्हणाले. आपण महाराष्ट्राला वाचवायला निघालो आहोत. त्यामुळेच महाराष्ट्राला उद्ध्वस्त करायला निघालेल्या लोकांना संदेश देऊयात. तुमचा काळ आता संपला आहे. भाजपची सत्ता महाराष्ट्रात येऊन आता गोरगरीब तरूणांना रोजगार मिळू शकतील आणि प्रगतीकडे वाटचाल करता येईल यासाठी प्रयत्न करूयात असेही नारायण राणे म्हणाले.