औद्योगिक वसाहतीतील कामगारांची गैरसोय : पथदीप बंद असल्याने अंधाराचे साम्राज्य, समस्या सोडविण्याची मागणी
प्रतिनिधी / बेळगाव
बेळगावची औद्योगिक वसाहत असणाऱया उद्यमबागमध्ये अंतर्गत रस्त्यांची चाळण झाली आहे. यामुळे कामगारांची गैरसोय होत असून अपघातांचे प्रमाण वाढले आहे. वेगा कारखान्याच्या बाजूने जाणाऱया रस्त्याची तर धूळदाण झाली असून, कामगारांना ये-जा करणेही कठिण झाले आहे. त्यामुळे हा रस्ता नव्याने करण्यात यावा, अशी मागणी उद्यमबाग येथील कामगारांमधून केली जात आहे.
राज्यात येणाऱया प्रत्येक सरकारकडून औद्योगिक वसाहतींसाठी पॅकेज जाहीर करण्यात येते. परंतु हे पॅकेज नेमके कुठे जाते, असा प्रश्न औद्योगिक वसाहतींची वस्तुस्थिती पाहिल्यानंतर उपस्थित होतो. बेळगाव महानगरपालिकेला सर्वाधिक कर उपलब्ध करून देणाऱया उद्यमबाग येथील औद्योगिक वसाहतीमध्येच अनेक समस्या वर्षानुवर्षे आहेत. केवळ आश्वासनांची खैरात करायची प्रत्यक्षात मात्र कोणताच विकास नाही, अशी परिस्थिती या परिसरात झाली आहे.
वेगा कारखान्याच्या बाजुने असणाऱया रस्त्यावर अनेक खड्डे पडले आहेत. तसेच हा रस्ताही अर्धवट स्थितीत आहे. काही ठिकाणी तर माती ओतून ठेवण्यात आली आहे. या परिसरात मोठय़ा कारखान्यांची संख्या अधिक असल्याने दररोज शेकडो कामगारांची ये-जा असते. त्याचप्रमाणे या परिसरात शाळा असून, शाळेला आणण्या व सोडण्यासाठी पालकांची वर्दळ असते. त्यामुळे या सर्वांनाच या खराब झालेल्या रस्त्याचा फटका बसत आहे. त्यामुळे हा रस्ता पुन्हा करावा, अशी मागणी कामगार व पालकांमधून केली जात आहे.
पथदीप केवळ शोभेपुरतेच महानगरपालिकेला सर्वाधिक कर भरणारा परिसरच मागील काही दिवसांपासून अंधारात आहे. पथदीप बंद असल्याने ते शोभेसाठी लावण्यात आले आहेत का, असा प्रश्न उद्योजक उपस्थित करीत आहेत. वारंवार महानगरपालिकेच्या पथदीप विभागाला कळवून देखील त्यांच्याकडून दुरुस्ती केली जात नसल्याने परिसरातील कामगार हैराण झाले आहेत. त्यामुळे रात्रीच्यावेळी अंधारातून कामगारांना प्रवास करावा लागत आहे.