वार्ताहर / किणये
बेळगाव-पणजी महामार्गावरील उद्यमबागनजीकच्या रस्त्यावर पावसाचे पाणी येऊ लागले आहे. याचा वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. चक्क महामार्गावरच पावसाचे पाणी येत असल्यामुळे वाहनधारकांतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
बेळगाव स्मार्ट सिटी करण्यासाठी प्रशासनामार्फत जोरदार कामकाज सुरू आहे. बेळगाव-पणजी राष्ट्रीय महामार्गावरील उद्यमबागनजीकच्या परिसरात थेट रस्त्यावरूनच पावसाचे पाणी वाहू लागल्यामुळे ये-जा करणाऱया वाहनधारकांना बरीच कसरत करावी लागत आहे.
उत्सव हॉटेलनजीकच्या सर्कलपासून रस्त्यावरून थेट पाणी वाहू लागले आहे. एका चार चाकी शोरुमच्या बाजूलाच मुख्य महामार्गावर पाणी वाहताना दिसत आहे. मोठी वाहने जात असताना बाजूच्या दुचाकी वाहनधारकांच्या अंगावर हे पाणी उडत आहे. यामुळे अनेक दुचाकीस्वार या ठिकाणाहून ये-जा करत असताना रस्त्याच्या पाण्यामुळे भिजून गेले आहेत.
पाण्याचा निचरा गटारीतून होण्याची गरज आहे. मात्र, पावसाचे पाणी थेट रस्त्यावरून वाहू लागल्यामुळे महामार्ग व गटारीचे कामकाज कशा पद्धतीने करण्यात आले आहे, याची उलटसुलट चर्चाही उद्यमबाग परिसरात होऊ लागली आहे.