ऑनलाईन टीम / मुंबई :
मुंबई उच्च न्यायालयाने अकरावी प्रवेशासाठीची सीईटी परीक्षा रद्द केल्यानंतर, राज्याच्या शिक्षण विभागाने ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेतला आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ऑनलाईन केंद्रीय प्रवेश प्रक्रिया वेळापत्रक जाहीर केले असून उद्यापासून म्हणजेच शनिवारपासून अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे.
याबाबत अधिक माहिती देताना वर्षा गायकवाड म्हणाल्या, उद्यापासून 22 ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाचा भाग 1 भरायचा आहे. तर 17 ते 22 ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांचा अर्जाचा भाग 2 भरावा लागणार आहे. विद्यार्थी स्वतःचा लॉग इन आयडी आणि पासवर्ड तयार करून हे रजिस्ट्रेशन करू शकणार आहेत. त्यानंतर 25 ऑगस्टला या संदर्भातील पहिली गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे. त्यानंतर जे पसंती क्रमांक मिळाले आहेत त्यानुसार 27 ऑगस्टला सकाळी 10 वाजता पहिली गुणवत्ता यादी जाहीर होईल. त्यामध्ये विद्यार्थ्यांना कोणत कॉलेज मिळालं आहे हे कळेल.
- पाच मनपा क्षेत्रातील सर्व प्रवेश ऑनलाईन पद्धतीने होणार
मुंबई, ठाणे, रायगड, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, नागपूर, अमरावती आणि नाशिक महानगरपालिका क्षेत्रासह मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणमध्ये परिभाषित पाच ऑनलाइन प्रवेश क्षेत्रांमध्ये ही ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया होणार आहे. सदर पाच ठिकाणच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक यासोबत संलग्न आहे. उक्त पाच क्षेत्र वगळता उर्वरित महाराष्ट्रातील प्रवेश स्थानिक परिस्थितीनुसार प्रचलित पद्धतीने केले जातील.