18 ते 44 वयोगटातील व्यक्तींचे होणार लसीकरण : 30 जुलैपर्यंत पहिला डोस लसीकरण पूर्तीचे ध्येय
प्रतिनिधी / पणजी
राज्यात उद्या रविवारपासून तिसऱया टप्प्यातील टीका उत्सव प्रारंभ होत असून त्याद्वारे 18 ते 44 वयोगटातील सर्वांचे लसीकरण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. या माध्यमातून आम्ही प्रत्येक ग्रामपंचायत, नगरपालिकांपर्यंत पोहोचणार असून सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले आहे. त्याचबरोबर 30 जुलैपर्यंत राज्यातील 100 टक्के नागरिकांना पहिला डोस देऊन लसीकरण पूर्ण करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
शुक्रवारी सायंकाळी राज्यातील लोकांशी लाईव्ह संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी टीका उत्सव -3 ची घोषणा केली. केंद्र सरकारने देशातील 18 वर्षांवरील सर्व लोकांचे मोफत लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचाच भाग म्हणून उद्या रविवारपासून गोव्यातही 18 ते 44 वयोगटातील सर्वांचे लसीकरण प्रारंभ होणार आहे. या उत्सवाच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक ग्रामपंचायत, नगरपालिकांपर्यंत पोहोचणार असून सविस्तर वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. परंतु त्यासाठी कुणीही गोंधळ, गडबड, घाई करू नये. प्रत्येकाने स्वतःच्या पंचायत वा पालिकेत शिबीर, कार्यक्रम असेल त्यावेळी उपस्थिती लावून नोंदणी करावी व लस घ्यावी. अन्य पंचायत, पालिका परिसरात गर्दी करू नये, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केली आहे.
कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरणाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे जानेवारी महिन्यापासूनच राज्य आणि केंद्र सरकारने मोठय़ा प्रमाणात लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. त्यातून पहिल्या टप्प्यात मेडिकल, पॅरामेडिकल, फ्रंटलाईन वर्कस या गटांचे लसीकरण करण्यात आले. त्यामुळे हेच फ्रंटलाईन वर्कर कोरोनाच्या दुसऱया लाटेवेळी खूप चांगले काम करू शकले. दुसऱया टप्प्यात 60 वर्षे वयोगटावरील ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. त्यालाही राज्यात खूप चांगला प्रतिसाद मिळाला. तिसऱया टप्प्यात 45 ते 60 वर्षे वयोगटातील सर्वांचे लसीकरण हाती घेतले. त्यावेळी ग्रामपंचायती, नगरपालिका तसेच सर्व राजकीय नेते व कार्यकर्त्यांनी सहभाग व सहकार्य दिल्यामुळेच टीका उत्सव-1 व 2 यशस्वी होऊ शकले.
राज्यात 87 लसीकरण केंद्रे
सध्या 45 वर्षे वयोगटातील 75 टक्के लोकांनी लस घेतली आहे. 30 टक्के लोकांनी अद्याप पहिलाही डोस घेतलेला नाही. अशा सर्वांनी ती लस त्वरित घ्यावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. राज्यात 87 लसीकरण केंद्रे आहेत. तेथे हजेरी लावून त्यांनी पहिला डोस घ्यावा.
कोरोनाच्या तिसऱया लाटेची चिंता
यापुढे कोरोनाच्या तिसऱया लाटेची चिंता सतावू लागली आहे. या लाटेत लहान मुले बाधित होऊ शकतात. त्यामुळे आम्ही सर्वप्रथम 18 ते 44 वयोगटात अंगावर दुध पाजणाऱया माता, कोमोर्बिड स्थितीतील युवक युवती आणि दर्यावर्दी लोकांचे लसीकरण हाती घेतले. गत आठ दिवसांपासून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
लसीकरणाचे ध्येय गाठण्यासाठी सहकार्य करावे
प्रत्येक केंद्रावर रोज 250 जणांचे लसीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येकाकडून सहकार्य अपेक्षित आहे. एकूण 87 लसीकरण केंद्रांमधील 35 केंद्रे ही पीएचसी, सीएचसी कायमस्वरुपी आहेत तर अन्य केंद्रे पंचायत, पालिका क्षेत्रात तात्पुरती स्थापन करण्यात येणार आहेत. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पंचायत, पालिका पातळीवरील सर्व लोकप्रतिनिधी तसेच पक्षनेते आणि कार्यकर्त्यांनी सहकार्य करावे, तरच 30 जुलै पर्यंतचे लक्ष्य साध्य करणे शक्य होणार आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.