पहिल्याच दिवशी उतरणार 15 विमाने निम्मे प्रवासी येणार रेल्वेतून तपासणी, विलगीकरणाचा उडणार बोजवारा गोमंतकीयांमध्ये कमालीची घबराट
प्रतिनिधी / पणजी
सोमवारपासून सुरू होणारी विमानसेवा आणि त्या पाठोपाठ सुरू होणाऱया रेल्वे सेवेमुळे दिवसाकाठी राज्यात किमान 3 ते 4 हजार नागरिक गोव्यात पोहोचणार असल्याने गोवा सरकारच्या अडचणी वाढल्या आहेत. राज्यात आजघडीस कोविड 19 चे 39 रुग्ण असून सर्वच्या सर्व हे गोव्याबाहेरून आलेले आहेत. विमानतळ व रेल्वे स्थानकावर सरकारी यंत्रणा उभी करण्याचा सरकारचा इरादा असला तरी दिवसाकाठी 4 हजार जणांचे विलगीकरण करणे अशक्यप्राय झाले असून राज्यात कोविड 19 चा फैलाव मोठय़ा प्रमाणात होईल असा अंदाज असल्याने गोमंतकीयांमध्ये कमालीची घबराट पसरली आहे.
प्राप्त माहितीनुसार सोमवारपासून विमानसेवा आणि त्यानंतर लवकरच रेल्वे सेवाही सुरू होत आहेत. रेल्वेगाडय़ांतून मोठय़ा प्रमाणात नागरिक गोव्यात येण्याची शक्यता आहे. या शिवाय दाबोळी विमानतळावर अनेक विमाने पहिल्याच दिवशी उतरण्याची शक्यता आहे. या परिस्थितीमुळे राज्यात येणाऱया प्रवाशांची कडकपणे तपासणी आणि नियमानुसार त्यांना 14 दिवसांच्या विलगीकरणात ठेवण्याची सक्ती आहे. परंतु सध्या परिस्थिती एवढय़ा मोठय़ा प्रमाणात दररोज प्रवाशांची तपासणी व विलगीकरण करणे सरकारला शक्य होणार नाही. सरकार पातळीवर यामुळेच चिंता वाढत चालली आहे. जनतेमध्ये या प्रकारामुळे घबराट पसरलेली आहे. सरकार आता नेमके काय करणार व कोणता निर्णय घेणार? याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.
हवाई कंपन्यांकडून बुकिंग सुरू
हवाई कंपन्यांनी गोव्यासाठी बुकिंग सुरू केले असून सोमवारी 25 रोजी तब्बल 15 विमाने गोव्यातील दाबोळी विमानतळावर उतरतील. यानंतर रोज सरासरी 1500 प्रवासी गोव्यात येणार असल्याचे गोवा विमानतळ संचालक गगन मलिक यांनी स्पष्ट केले आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर विमान वाहतुकीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.
भारतीय हवाई प्राधिकरणानेही गोव्यात 15 विमाने सोमवारी उतरणार असल्याचे स्पष्ट केले आहे. ऑनलाईन तिकीट बुकिंगचे प्रमाण पाहता मंगळवार 26 रोजी जास्तीतजास्त 22 विमाने गोव्यात दाखल होण्याची शक्यता आहे. शुक्रवार 22 रोजी हवाई प्राधिकरणाच्या अधिकाऱयांनी खासगी एजन्सी आणि राज्य सरकारच्या एजन्सीकडे भेट घेऊन यासंदर्भात चर्चा केली. देशी कंपन्यांच्या गोव्यातील आगमनाबाबत व हाताळणीबाबत चर्चा करण्यात आली.
पहिल्या टप्यात देशातील विविध बडय़ा विमानतळावरून 15 प्रवासी विमाने गोव्यात दाखल होणार आहे. प्रवासी संख्या वाढल्यानंतर येत्या काळात विमानांची संख्याही वाढणार आहे. दरदिवशी 1400 ते 1500 प्रवासी विमानातून गोव्यात दाखल होतील. तुर्तास प्रत्येक विमानातून 100 प्रवासी येतील. विमानांची क्षमता 160 ते 180 प्रवाशांची आहे, मात्र सध्या एका विमानात 100 प्रवाशांची वाहतूक निश्चित केली आहे.
दरम्यान, देशाच्या विविध भागामध्ये सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. गोवा सुरक्षित असल्याने सध्या देशभरातील विविध राज्यातील लोक गोव्याकडे धाव घेत आहेत. खासगी वाहने, बसगाडय़ा व रेल्वेतून प्रवाशी गोव्यात येत आहेत, मात्र खासगी वाहनातून गोव्यात आलेले अनेकजण कोरोना चाचणीत पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्याचबरोबर रेल्वे आणि बसगाडय़ातून आलेले मुंबई दिल्लीतील प्रवासीही पॉझिटिव्ह सापडले आहेत. आता सोमवारपासून विमानसेवा सुरू होत आहे. दरदिवशी साधारणपणे 1500 प्रवासी गोव्यात दाखल होतील. त्यानंतर गोव्यात काय स्थिती असेल हे मात्र सांगता येत नाही. मात्र गोव्यात विमानसेवा सुरू होत असल्याने तो चर्चेचा विषय ठरला आहे.
रेल्वेचेही बुकिंग सुरू
कोकण रेल्वे आणि दक्षिण पश्चिम रेल्वेने गोव्यात राखीव बुकिंगसाठी काऊंटर सुरू केले आहेत. 1 जूनपासून प्रवासीसेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. कोकण रेल्वेने गोव्यातील सर्व रेल्वे स्थानकावर बुकिंग काऊंटर सुरू केले आहेत. पणजीतही एक बुकिंग काऊंटर खुले केले आहे, मात्र दक्षिण पश्चिम रेल्वेने केवळ वास्को रेल्वे स्थानकावरच काऊंटर खुले केले आहे.