राजपुरे.
जगामध्ये निसर्गाने खूप चांगल्या गोष्टी निर्माण केलेल्या आहेत. त्यांचा भविष्यात मोठे होऊन जर आनंद घ्यायचा असेल तर आज घरीच रहा हे आपण लॉकडाऊनच्या काळात आपल्या मुलांना शिकवले व स्वतः देखील आत्मसात केले. आपण व आपल्या कुटुंबातील सदस्य लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून एकदाही बंगल्याच्या गेटच्या बाहेर गेलेलो नाही. लॉकडाऊन जाहीर झाला हे आधी न पटण्यासारखे होते. कारण आपल्या कोणाच्याही आयुष्यात असा प्रसंग कधीही आलेला नाही. आपण कुणीही असा प्रसंग आयुष्यात कधी आपल्यावर येईल याची कल्पना देखील केलेली नव्हती. किंबहुना असं काही असतं हे देखील आपल्या ध्यानीमनी नव्हते. लॉकडाऊन सुरू झाल्या नंतरच्या पहिल्या काळात आम्ही दोघांनी आमच्या मुलांना समजावून सांगितले. त्यांना विश्वासात घेतले. आपला बंगला, आपल्या गाडय़ा, आपले जीवन आणि निसर्गातील ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्यांचा पुढे तुम्हाला आनंद घ्यायचा असेल तर आज आपल्याला घरातच राहावे लागेल हे मी व माझी पत्नी स्मिताली यांनी मुले सुस्मिता, श्रावणी, वंश व शौर्य यांना शिकवले समजावून सांगितले. त्यांना ते हळूहळू पटले देखील. आज लॉकडाऊन असल्यामुळे आमच्या घरी कामाला कोणीही कामगार येत नाहीत. यामुळे मग आम्ही आधी आमच्या कुटुंबात कामे वाटून घेतली. बंगल्या मधील अमुक खोली कोणी साफ करायची, बाग कुणी सांभाळायची, बागेला पाणी कोणी घालायचे, किचन मध्ये कोणी मदत करायची आदी छोटी छोटी कामे देखील आम्ही कुटुंबामध्ये वाटून घेतली. सध्या लॉकडाऊन असल्यामुळे अंमळ जाग उशिराच येते. मुलांच्या ऑनलाईन शिकवण्या सुरू असल्याने मुले थोडी लवकर उठतात. मात्र मी थोडा उशीरा उठतो. उठल्यानंतर बंगल्याच्या दर्शनी भागात बसून चहापाणी होते. हे चहापाणी करत करत गप्पा मारून झाल्यानंतर दुपार उजाडते. यानंतर अंघोळ वगैरे झाल्यानंतर होम मिनिस्टर यांनी बनवलेल्या सुग्रास जेवणाचा आम्ही सर्वजण आस्वाद घेतो. लॉकडाऊनच्या काळात आमची रोज वेगवेगळी फर्माईश असते. यानंतर पुन्हा विश्रांती. यानंतर बागेत काम करणे, मुलांबरोबर बंगल्याच्या आवारातच क्रिकेट आणि बॅडमिंटन खेळणे, बागेत येणाया पक्ष्यांची निरीक्षण करणे, बंगल्याच्या मागे आम्ही जो भाजीपाला आमच्या पुरता पिकवलेला आहे त्यांची काळजी घेणे आदी कामे मी अगदी आवडीने करतो. आमचा बंगला बांधून अजून एक वर्ष देखील झालेलं नाही. या वर्षभरात मला बंगल्याचा उपभोग घेता आलेला नव्हता. लॉक डाऊन च्या काळामध्ये मी बंगल्याचा पुरेपूर उपभोग घेतला. यातून मला खूप एनर्जी मिळाली. आमच्या बंगल्याच्या बाजूला असलेल्या आमच्या प्लॉटमध्ये दोन काजूची झाडे आहेत. या झाडांवर मोठय़ा प्रमाणात काजू च्या बिया येतात. या काजूच्या बिया टिपून आणून आम्ही त्या भाजून खातो. हे करताना आम्हाला खूप कौटुंबिक स्वास्थ्य मिळते. आपण जे आपले म्हणतो, जी आपली मालमत्ता आहे, संपत्ती आहे ती आज आपली आहे ती उद्या कुणाची तरी होणार आहे, या नश्वर जगाची चांगली ओळख आम्हाला लॉक डाऊन मुळे झाली. कॉलेज व दुकान यात हरवलेले घरपण आज आम्ही सर्वजण घरी एकत्र अनुभवतोय.
आमचे गाव कळंबट हे तालुक्यातच आहे. माझ्या वडिलांना दापोलीतून त्या गावात सोडायचे होते. तरीदेखील आम्ही गाव तालुक्यात असून देखील पोलिसांकडून रीतसर परवानगी घेतली. नंतरच त्यांना आम्ही गावी नेऊन सोडले. एवढी सर्व काळजी प्रत्येक कुटुंबाने घेतली तर आपण नक्कीच कोणाला हरवू शकतो.
-संदीप राजपुरे,
कार्यकारी अधिकारी, रामराजे महाविद्यालय, दापोली.