काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आरोप- पंतप्रधानांना केले लक्ष्य
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले आहे. राहुल यांनी केंद्र सरकारवर देशाच्या सर्व संपत्तींची विक्री करण्याचा आरोप केला आहे. सरकारच्या नव्या ऍसेट मोनेटायजेशन पाईपलाइन प्रोग्रामवर (एनएमपी) टीका करत त्यांनी यामुळे रोजगार संपुष्टात येणार असून निवडक उद्योगपतींचा लाभ होणार असल्याचे म्हटले आहे.
70 वर्षांमध्ये निर्माण झालेली संपत्ती सरकार विकत आहे. सरकारचे धोरण 2-3 उद्योगपतींना नजरेसमोर ठेवूनच तयार केले जात आहे. ‘70 वर्षांमध्ये काहीच झाले नाही’ असा नारा नरेंद्र मोदी आणि भाजपने दिला होता. तर अर्थमंत्र्यांनी 70 वर्षांमध्ये देशाचे निर्माण झालेले भांडवल विकण्याचा निर्णय घेतला आहे. याचाच अर्थ पंतप्रधानांनी सर्व काही विकल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
केंद्र सरकारचा निर्णय म्हणजे जनतेच्या भविष्यावरील आक्रमण आहे. प्रत्येक क्षेत्र खासगी हातांमध्ये सोपविण्याची तयारी आहे. ऊर्जा, दूरसंचार, खाणी, विमानतळ ही क्षेत्रे खासगी उद्योगांना सोपविण्यात येत असून याचा उद्देश मक्तेदारी निर्माण करणे आहे. भविष्यात या मक्तेदारीमुळे मोठे नुकसान होण्याची चिन्हे आहेत. याचा सर्वात मोठा फटका छोटय़ा उद्योगांना बसणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे.