मूळ बावशी येथील विष्णू मरये यांचा मुंबईत केला सन्मान
अजय कांडर / कणकवली:
उद्योगपती रतन टाटा मोठय़ा मनाचे, दानशूर व्यक्ती म्हणून जगप्रसिद्ध आहेत. आपल्या बरोबरच्या उद्योगपतींबरोबर सामान्यातल्या सामान्य माणसाचाही गौरव व्हावा, अशी मनिषा बाळगत ते कार्यरत असतात. बावशी येथील ग्रामस्थ आणि मुंबई येथे पोस्टमन म्हणून कार्यरत असणारे विष्णू मरये यांनी कोविड कालावधीत तब्येत बरी नसतानाही पोस्टमन म्हणून केलेल्या कामाची रतन टाटा यांनी दखल घेऊन त्यांना आपल्या कुलाबा येथील कार्यालयात निमंत्रित करून सन्मान केला. याबद्दल मरये यांचे सर्वत्र कौतूक होत आहे.
देशाचं अर्थकारण ज्या उद्योगपतींवर अवलंबून आहे, त्यात रतन टाटा हे महत्वाचं नाव आहे. त्यांचं दानशूर व्यक्तिमत्व त्यांच्या विविध सामाजिक कामातून वेळोवेळी लक्षात येत असते. देश अडचणीत असेल, अशावेळी ते आपल्याकडून सर्वतोपरी मदत करतात. या कोविड कालावधीत त्यांनी केंद्र शासनाला बाराशे कोटी रुपये दिले आणि त्याचा गाजावाजाही केला नाही. अशा व्यक्तीने विष्णू मरये यांच्यासारख्या सामान्य कर्मचाऱयाचा आपल्या कार्यालयात बोलून गौरव करणे यातच टाटांच्या मोठय़ा मनाचं दर्शन घडते.
मरये हे बावशी-गावठाण येथील ग्रामस्थ. ते मुंबई येथील पोस्ट कार्यालयात पोस्टमन म्हणून गेली अनेक वर्षे कार्यरत आहेत. अतिशय प्रामाणिकपणे काम करणारा हा कर्मचारी कोविड कालावधीतही आपल्या कामाचे योगदान देत राहिला. कोविड कालावधीमध्ये तब्येत बरी नसतानाही त्यांनी वेळोवेळी आपली डय़ुटी बजावली. या सगळय़ाची दखल रतन टाटा यांनी घेऊन मरये यांना आपल्या कुलाबा येथील आलिशान कार्यालयात निमंत्रित करून त्यांचा गौरव केला.
या गौरवाबद्दल मरये म्हणाले, मी मुंबईत गेली अनेक वर्षे प्रामाणिकपणे पोस्टमन म्हणून कार्यरत आहे. उन्हाळय़ाला-पावसाळय़ात कोणताही त्रास झाला, तरी मी माझी डय़ुटी अधिकाधिक प्रामाणिकपणे केली आहे. कोविड कालावधीतही बाहेरील वातावरणाला न घाबरता, डय़ुटी बजावत राहिलो. या सगळय़ाची दखल घेऊन भारतरत्न म्हणून ज्यांचा आदराने उल्लेख केला जातो, अशा उद्योगपती रतन टाटांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य कर्मचाऱयाच्या कामाची दखल घेतली, हा माझ्या आयुष्यातील सर्वोच्च सन्मान आहे आणि तो माझ्या बावशी गावाचाही सन्मान आहे.