कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा निर्णय
प्रतिनिधी/ पणजी
उद्योगांमध्ये काम करणाऱया कामगारांच्या कामाचे तास 8 तासावरून 12 तास करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून त्याबाबतची अधिसूचनाही जारी केली आहे. कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर सरकारचा हा निर्णय कामगारांच्या दृष्टीने गंभीर ठरण्याची शक्यता आहे. या अगोदर कामगार संघटनांनीही याबाबत भाकीत करून त्याला आक्षेप घेतला होता. सरकारचा हा आदेश 31 जुलैपर्यंत लागू रहाणार आहे.
कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर जे निर्बंध आले होते त्याला अनुसरून सरकारने हा निर्णय घेतला आहे. कामगारांच्या फिरण्यावर निर्बंध आल्याने त्याचा परिणाम उद्योगावर झाला. त्यामुळे आता अशा प्रकारे निर्णय घ्यावा लागला. जास्तीत जास्त क्षमतेचा वापर करण्याच्या दृष्टीने कामाचे तास वाढविण्यात आले आहेत.
मात्र कामाच्या दिवशी 12 तासापेक्षा जास्त काम करून घेता येणार नाही. त्याचबरोबर मध्यांतर किंवा आराम मिळून 13 तास होता कामा नये, असेही सूचित करण्यात आले आहे. मात्र या अधिसूचनेमुळे औद्योगिक कामगारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. सरकारचा हा आदेश कामगारांना बाधक ठरणार नाही ना अशी भीती व्यक्त होत आहे.
ओव्हर टाईमचा मोबदला दुप्पट द्यावा
ओव्हर टाईम धरुन आठवडय़ाचे काम 60 तासांपेक्षा अधिक होता कामा नये. सतत 7 दिवसांपेक्षा अधिक दिवस ओव्हर टाईम करायला लावू नये. एका आठवडय़ात 48 तासांपेक्षा अधिक काम झाल्यास त्यातील अधिक तास हे ओव्हर टाईम गणले जावेत. या तासांच्या कामाचा मोबदला दुप्पट द्यावा. कामगाराला आठवडय़ाच्या सुट्टीचा लाभ मिळेल. ती सुट्टी त्याने उपभोगली नाही तर दोन महिन्यांच्या आत त्या अशा सुट्टय़ा घेतल्या पाहिजेत, असे स्पष्ट करण्यात आले आहे. याशिवाय लॉकडाऊनचे सर्व नियम पाळण्याचे बंधनकारक केले आहे.
वाहतूक व्यवस्था अन्य सुविधांचे काय?
सरकारने अधिसूचना जारी केली असली तरी वाहतूक व्यवस्था व सुविधांबाबत काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. सकाळी आठ ते रात्री आठ अशी कामाची वेळ असल्यास किंवा पाळीनुसार काम असल्यास वाहतूक व अन्य सुविधांचे काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याचबरोबर फॅक्टरीमध्ये मोठय़ा प्रमाणात महिला कामगार काम करीत आहेत, त्यांना वाहतूक सुविधेची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. सलग 12 तास काम राहिल्यास त्यामुळे कामाचा ताण वाढण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर बस वाहतूकही उपलब्ध नसल्याने कामगार अडचणीत येण्याची शक्यता आहे.
कामगार कपातीचा धोका
सरकारनेच आदेश जारी केल्याने आता कंपन्यांना आयते कोलीत हाती मिळण्याची भीती आहे. सध्या कंपन्या उत्पादन करीत असली तरी उत्पादनांची निर्यात व मागणी लॉकडाऊनमुळे घटली आहे. अशा स्थितीत 12 तास कामाची सक्ती घातक ठरण्याची शक्यता आहे. नियम पाळणे कठीण बनलेल्या कामगारांना नोकरी गमावण्याची पाळी येण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर 31 जुलै नंतरही 12 तासांचा कालावधी पुढेही सुरू राहिला तर काय करायचे हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे कामगारांमध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली आह.